हरियाणातील जलाभिषेक यात्रेवर हल्ल्याची तयारी मुस्लिमांनी आधीच केली होती - आलोक कुमार

01 Aug 2023 13:03:40
HARYANA-NUH 
 
पुणे : ३१ जुलै २०२३ रोजी हरियाणातील मेवात येथील नूह येथे हिंदूंच्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही हजारो यात्रेकरू अडकले आहेत, असे मीडिया अहवालात म्हटले आहे. दरम्यान, हिंसाचाराची आग गुरुग्राममधील सोहनापर्यंत पोहचली आहे. येथेही वाहनांना आग लावल्याचे वृत्त आहे.
 
 
 
या हिंसाचारादरम्यान पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाने केलेल्या गोळीबारात दोन होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. नूह आणि गुरुग्राममध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यात्रेला सुरुवात झालेल्या नल्हार शिवमंदिरात शेकडो लोक अडकल्याची माहिती आहे. त्यात महिलांची संख्या मोठी आहे. पोलिस ठाण्यांवरही हल्ले झाले आहेत.
 
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले की, “हिंसाग्रस्त भागात अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे. आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांचे सैन्य तेथे तैनात करण्यात आले आहे. लोकांनी अफवा पसरवू नये म्हणून मेवातचे इंटरनेट बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिथे लोक अडकले आहेत, तिथून लोकांना बाहेर काढले जात आहे.
 
नूह येथील हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. स्थानिक सायबर पोलिस ठाण्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. स्थानिकांचा दावा आहे की त्यांनी १९९२ नंतर असा हिंसाचार पाहिला नव्हता. नूह येथील रहिवासी असलेल्या गौरवने सांगितले की, आधी जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. यावर पोलिसांनी गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे दंगेखोर पळून गेले. मात्र त्यानंतर हजारो लोकांनी येऊन दगडफेक करत पोलीस ठाण्याला आग लावली.
 
विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी हा हल्ला सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. मुस्लिमांनी यासाठी पूर्ण तयारी केली होती. ते अनेक दिवसांपासून दगड गोळा करत होते. ते म्हणाले की, “ब्रज मंडळाची यात्रा नल्हार महादेव मंदिरापासून सुरू होणार होती. जलाभिषेक होणार होता. हा कार्यक्रम दरवर्षी होतो. २० हजार लोक येतात, सर्वांना माहिती आहे. यासाठी पोलिसांनी तयारी केली नाही. मुस्लिम अनेक दिवसांपासून दगड गोळा करत होते. योजना तयार होत होती. या हल्ल्याची पूर्वतयारी करण्यात आली होती.
 
आलोक कुमार यांनी सांगितले की, ज्या भागात मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे तेथे अजूनही शेकडो लोक अडकले आहेत. सरकारने लवकरात लवकर या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढावे. त्याचबरोबर ते म्हणाले की, “आम्ही केवळ सरकारचा आश्रय घेत नाही. स्वसंरक्षणाचा अधिकारही आहे. म्हणूनच हिंदू आपल्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करून अशा हल्ल्यांना तोंड देईल. यानंतर जे होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आम्ही पण तोंड देऊ. घाबरणारही नाही. मेवातला हिंदूंसाठी सुरक्षित ठिकाण बनवू.
 
 
 
Powered By Sangraha 9.0