पश्चिम बंगाल हिंसाचार : आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

09 Jul 2023 15:52:37
West Bengal Violence Panchayat Election

मुंबई
: पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या आधीच हिंसाचार घटना घडत असून आतापर्यंत विविध ठिकाणी २६ जण ठार झाले आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस, माकप- डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, पंचायत निवडणुका सुरु होण्याआधीच सात जणांचा मृत्यु झाला होता. तसेच, अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दि. ८ जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. दिवसभरात तब्बल १० पेक्षा अधिक विविध राजकीय पक्षांच्या हत्या करण्यात आल्या. या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारकडे अहवाल मागविला आहे. प. बंगालमध्ये शनिवारी २२ जिल्हा परिषदा, ९ हजार ७३० पंचायत समित्या आणि ६३ हजार २२९ ग्रामपंचायतींच्या सुमारे ९२८ जागांसाठी मतदान झाले. पंचायत निवडणुकीची मतमोजणी येत्या ११ जुलै रोजी होणार आहे.
 
राज्यात सर्वत्र भयाचे वातावरण

पंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात सर्वत्र भयाचे वातावरण असून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवाची भिती निर्माण झाली आहे. राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निमलष्करी दले तैनात असूनही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आणखी हिंसाचार होण्याची शक्यता असल्याची भिती नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाने निकालानंतर पुढील १० दिवस निमलष्करी दले तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0