सरदारांच्या जीवावर राज्य करणारे आता जनतेच्या दारात!

04 Jul 2023 16:54:07
Rayat Kranti Sanghatna Chief Sadabhau Khot

मुंबई 
: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता पळून जाताना आपण पाहिले असून ते आता जनतेत जाऊन सांगत आहेत की आपल्याला लपायला जागा द्या, असा उपरोधिक टोला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला. ते म्हणाले, राष्ट्रवादी हा सरदारांचा पक्ष त्यामुळे शरद पवारांनी आतापर्यंत सरदारांच्या जीवावर राज्य केले असून त्यांना आता राज्यातील जनता आठवली आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी पवारांचा समाचार घेतला. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाची सद्यस्थिती ही पवारांच्या पापाचे प्रायश्चित असे म्हटल्यास वावगे ठरु नये, असे खोत म्हणाले.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाराष्ट्रात जे भल्याभल्यांना जमले नाही ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करुन दाखविल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतदादा पाटील यांच्यापर्यंतचा राजकीय आलेख पाहता, आम्ही करु तोच कायदा ही मानसिकता संपविण्याचे काम फडणवीस करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच गावगाडा व्यवस्थित उभा करायचे असेल तर काही व्यवस्था बदलाव्या लागतील त्या बदलण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस करत आहेत, आम्ही त्याचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0