ठाणे : अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ आहे. त्याचा पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे या घटनांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे येत्या ०१ ऑगस्टपासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल. नागरिकांनी या काळात आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा. पाणी काटकसरीने तसेच, गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.