पाटणा : बिहारमध्ये पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच परीक्षार्थी आणि शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता. आता वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर बिहार पोलिसांनी गोळीबार केला आहे. कटिहारमध्ये पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भाजपने नितीश कुमार यांची तुलना जनरल डायरशी केली आहे.
सतत वीज खंडित झाल्याने हैराण झालेली कटिहारमधील जनता वीज विभागाविरोधात रस्त्यावर उतरली होती. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे वीज विभागाविरोधात लोकांनी रास्ता रोको केला होता. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये ५ जणांना गोळ्या लागल्या. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एकाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. खुर्शीद आलम (३४) असे मृताचे नाव असून तो बसल गावचा रहिवासी आहे.
दुसरीकडे, बारसोईच्या चापाखोड पंचायतीत राहणारे नियाज आलम (वय ३२) यांची प्रकृती चिंताजनक आहे. कटिहार जिल्ह्यातील बारसोई उपविभागात बुधवारी (२६ जुलै २०२३) दुपारी स्थानिक लोकांनी घेराव करण्यासाठी विद्युत विभागाचे कार्यालय गाठले. यावेळी लोकांनी प्राणपूरच्या बस्तौल चौक आणि बारसोई ब्लॉक मुख्यालयाचा मुख्य रस्ता अडवून निदर्शने केली.
जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस आंदोलनस्थळी पोहोचल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे. पोलिसांना पाहताच लोक संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात खुर्शीद यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
गोळीबारात झालेल्या मृत्यूनंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तुलना ब्रिटिश राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायरशी केली. शहजाद म्हणाले की, “बिहारच्या जनरल डायरने कटिहारमध्ये वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार केला. १ ठार, २ गंभीर जखमी. बिहारमध्ये तरुण, शेतकरी, शिक्षक, सामान्य माणूस... जो कोणी आपला हक्क मागतो त्याला लाठ्या किंवा गोळ्या घालतात.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हुकूमशहा असे वर्णन करून भाजपचे प्रवक्ते पुढे म्हणाले, “अलीकडेच एका भाजप नेत्याचाही पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला! जनरल नितीश डायर आणि त्यांच्या हुकूमशाही सरकारचा हा खरा चेहरा आहे. हे लोकशाहीचे रक्षण आहे की लोकशाहीची हत्या आहे? ही I.N.D.I.A. च्या लोकशाहीची कल्पना आहे का? बंगालपासून बिहारपर्यंत - गोळ्या, बॉम्ब, स्फोट?"