मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. परंतु, अगदी शेवटपर्यंत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतच होते. दरम्यान, जयंत सावरकर यांची सुरुवातीच्या काळात बदली कलाकार म्हणून ओळख होती. जर कोणताही कलाकार उपलब्ध नसेल तर त्या कलाकाराच्या भूमिकेसाठी जयंत सावरकरांची वर्णी लागत असे, अशी माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. यावेळी चंद्रकांत यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देखील दिला.
अमेरिकेत विश्व नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नाट्यसृष्टीची १०० वर्ष कशी होती याची माहिती देत विविध सादरीकरणं ठेवण्यात आली होती. यात पहिलेच सादरीकरण जयंत सावरकरांचे होते. यात त्यांनी 'एकच प्याला' या नाटकातील एक प्रवेश सादर केला होता. मात्र, त्यांच्या सादरीकरणाने अमेरिकेतील प्रेक्षक इतके भारावून गेले होते की त्यांनी सावरकरांना ३-४ मिनिटे उभे राहून त्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले होते. अशी आठवण चंद्रकांत यांनी यावेळी सांगितली. तसेच, भाषेची उत्तम जाण, नाटक तोंडपाठ असणारे अभिनेते निघून गेल्याची खंत देखील चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.