यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. सततच्या होणाऱ्या पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरर्स मागवले आहेत. हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरने आता बचावकार्य करण्यात येणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंबंधी ट्विट करत त्यांनी माहितीही दिली आहे. 'आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.' असं फडणवीस म्हणाले आहेत.
महागाव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायतमधील आनंद नगर येथे पाणी वाढत चालल्याने काही नागरिक बोटीवर बसलेत. या 45 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता पुराच्या पाण्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचले आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.