देशासाठी कारगिल युध्द लढलो, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही - मणिपूरमधील पीडित महिलेच्या पतीची उद्विग्न प्रतिक्रिया

21 Jul 2023 12:26:22
manipur women
 
मुंबई : मणिपूरमधील महिलांच्या नग्न परेडच्या व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच आता पीडितांपैकी एक महिला निवृत्त लष्करी जवानाची पत्नी आहे. अशी माहिती मिळाली आहे. हे दाम्पत्य सध्या चुरचंदपूर येथील मदत छावणीत राहत आहे. ४ मे २०२३ रोजी घडलेल्या घटनेपासून पीडित महिला तणावग्रस्त आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने या जोडप्याशी संवाद साधला आहे. ४२ वर्षीय पीडितेने सांगितले की, त्या दिवशी शेकडो लोकांच्या जमावाने तिला आणि आणखी एका महिलेला बंदुकीच्या जोरावर कपडे काढण्यास भाग पाडले. नग्न न झाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जमावाने त्यांना नग्न करून नाचायला लावले. त्यांच्याशी हाणामारी केली. त्याची परेड काढण्यात आली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, जमाव जंगली प्राण्यांप्रमाणे महिलांची छेड काढत होता.
 
या पीडितेचा ६५ वर्षीय पती भारतीय लष्करात सुभेदार पदावरून निवृत्त झाला आहे. त्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता. निवृत्त लष्करी जवानाने वृत्तपत्राला सांगितले की, “माझी पत्नी डिप्रेशनमध्ये गेली आहे. आमच्या मुलांची काळजी घेऊन ती सामान्य स्थितीत परत येण्यासाठी धडपडत आहे." ३ आणि ४ मे च्या घटनेचे वर्णन करताना ते म्हणाले की मी युद्ध पाहिले आहे. कारगिलमध्ये आघाडीवर लढाई केली आहे. पण जेव्हा मी सेवानिवृत्त होऊन घरी आलो तेव्हा मला ही जागा रणांगणापेक्षाही धोकादायक वाटते.
 
मणिपूरमध्ये महिलांसोबत झालेल्या क्रूरतेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात एक जमाव दोन महिलांना शेतात ओढत नेत असताना त्यांची नग्न परेड करताना दिसत आहे. या घटनेबाबत १८ मे रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, जमावाने तीन महिलांवर अमानुषपणे हल्ला केला. पोलिसांच्या ताब्यातून त्यांना हिसकावून घेण्यात आला.
 
या घटनेच्या तक्रारीत पीडितांनी म्हटले आहे की, ४ मे २०२३ रोजी त्यांच्या गावावर सुमारे ८०० ते १००० हल्लेखोरांच्या जमावाने हल्ला केला होता. जमावाकडे इन्सास आणि एके सिरीज रायफल्ससारखी घातक शस्त्रे होती. त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी ३ महिलांसह गावातील ५ जण जंगलाकडे धावले. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी सर्वांना वाचवले आणि त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात येऊ लागले. वाटेत जमावाने पोलीसांना रोखून पीडित महिलांचे अपहरण केले.
 
हिंसक जमावाने आधी २० वर्षीय पीडितेच्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर तीन महिलांना जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगण्यात आले. एका पीडितेच्या भावाने विरोध केल्यावर त्याला जमावाने बेदम मारहाण केली. या सर्व महिलांवर नंतर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गँगरेपनंतर तिन्ही महिलांना तेथून कसेबसे बाहेर काढण्यात यश आले. सध्या तिन्ही पीडित महिला मदत छावणीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0