मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हा पुरस्कार मोदींना देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेंनी आक्षेप घेतला होता. वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
भाई जगताप म्हणाले, "मला याबद्दल जास्त माहिती नाही. राजकीय मतभेद असू शकतात पण, अशा कार्यक्रमाला त्याला एकत्र येण्यावर विरोध का असावा? हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. लोकमान्य टिळक संस्था काँग्रेस म्हणून कधी काम करत नाही. ती स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी काय करावं हे काँग्रेस ठरवत नाही. मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय आहे? राजकीय मतभेद असू शकतात पण एकत्र यायला काही हरकत नसावी. महाराष्ट्राची वैचारिक अधोगती होतेय हे खरंय. राज्य केंद्र सरकारी कार्यक्रम असतील तर सर्व वाद बाजूला ठेवून एकत्रित यावं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे." असंही भाई जगताप म्हणाले.