भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्था विस्तारासाठी ‘एआय’ महत्त्वाचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

09 Jun 2023 17:44:43
Open AI CEO Sam Altman Met Narendra Modi

नवी दिल्ली
: ‘ओपन एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारताच्या तांत्रिक परिसंस्थेला एका नव्या उंचीवर नेऊ शकते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी ठरत असलेल्या ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन हे विविध देशांच्या दौऱ्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

दरम्यान, या भेटीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ते म्हणाले, भारताची तंत्रज्ञानविषयक परिसंस्था विस्तारण्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता निश्चितच खूप मोठी आहे. प्रामुख्याने भारतातील युवावर्गामध्ये याविषयी मोठी क्षमता आहे. भारतातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि देशातील तंत्रज्ञान परिसंस्था विस्तारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे भारतीय डिजीटल परिससंस्थेस गती देऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकार्याचे भारत स्वागत करतो, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

बैठकीविषयी सीईओ ऑल्टमन यांनीही ट्विट केले आहे. भारताच्या अतुलनीय तंत्रज्ञान परिसंस्थेविषयी आणि भारताला एआयचा होणारा लाभ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अतिशय सकारात्मक संवाद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘एआय’चे नियमन करणार – केंद्रीय मंत्री चंद्रशेखर

केंद्र सरकार नागरिकांच्या डिजीटल सुरक्षेसाठी सतर्क असल्याचे प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकारपरिषदेत केले. ते म्हणाले, इंटरनेटवर गुन्हेगारीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करणार आहे, अशी माहिती राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.


Powered By Sangraha 9.0