‘स्टार्टअप २०’ या नव्या उपक्रमाची ‘जी २०’ या जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली असून, त्याचा मुख्य उद्देश ‘जी २०’ सदस्य देशांमध्ये सहकार्याच्या माध्यामातून नव्या, कल्पक व सहकार्यावर आधारित स्टार्टअप उद्योगशीलतेला चालना देणे हा आहे. याद्वारे विविध देशांमध्ये यशस्वी स्टार्टअपच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेचे आदान-प्रदान करण्यासह विविध समस्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे.
भारतात स्टार्टअप क्षेत्राच्या प्रगती आणि विकासासाठी आवश्यक बाबींमध्ये विशेष व उत्साहवर्धक वाढ गेल्या काही वर्षांत झालेली दिसून येते. यामागे जसे सरकारी धोरणांसह विविध प्रयत्न आणि पुढाकार यांचे योगदान आहे, त्याच्याच जोडीला लघुउद्योगांतर्गत स्टार्टअप क्षेत्राच्या वाढत्या आणि बदलत्या गरजांनुरूप उद्योजकतेला पूरक आणि प्रेरक पद्धती आणि वातावरणाचा तो सामूहिक परिणाम म्हणावा लागेल. त्यातही जनसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांत स्टार्टअप क्षेत्राने व्यवसायवृद्धी व रोजगाराला चालना देणे, असे दुहेरी काम प्रामुख्याने केले असल्याने त्याचा उपयोग आणि उपयुक्तता आता पुरतेपणी सिद्ध झाली आहे.
स्टार्टअपची सद्यःस्थिती व त्यांचा नजीकच्या भविष्यातील विकास यासंदर्भात ’नॅसकॉम’द्वारा नव्यानेच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतातील स्टार्टअप क्षेत्राची विद्यमान क्षमता-कार्यक्रमता लक्षात घेता, त्याद्वारे २०२५ पर्यंत १२.५ लाख रोजगार सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. याच अहवालात पुढे नमूद केल्यानुसार आगामी तीन वर्षांत स्टार्टअप क्षेत्रातील व्यवसायात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात अपेक्षित रोजगार संधींची संख्या सुमारे ४० लाखांवर जाऊ शकते. ’नॅसकॉम’च्या या आकडेवारीनुसार आपल्याला भारतातील प्रस्तावित रोजगार क्षमता प्रामुख्याने लक्षात येते.
उपलब्ध तपशीलानुसार सध्या भारतात सुमारे ९३ हजार क्रियाशील स्टार्टअप आहेत. या जागतिक स्तरावर तुलना करता, ही संख्या जगात तिसर्या क्रमांकाची ठरते. यासंदर्भात अमेरिका अग्रेसर आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय स्टार्टअपचे देशाचा अर्थव्यवस्थेंतर्गत देशाच्या सकल घरेलू उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’च्या ४.५ टक्के योगदान आपल्या स्टार्टअपचे असते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील या अर्थपूर्ण योगदानाच्या जोडीलाच आपल्या स्टार्टअप उद्योगांची देशांतर्गत युवा उद्योजकांच्या सृजनशील उद्यमशीलतेला चालना व प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
भारतात वरीलप्रमाणे युवा उद्योजक व व्यावसायिकांची सक्रिय फळी तयार होण्यामागे जी प्रमुख कारणे आहेत, त्यामध्ये खालील मुद्यांचा प्रामुख्याने उलेख करावा लागेल-
सरकारचा धोरणात्मक पुढाकार
केंद्र सरकारने स्टार्टअप व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली आहे. यालाच ‘डिजिटल इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या प्रमुख व्यवसाय उपक्रमांची जोड देण्यात आली. त्यामुळे स्टार्टअपला आर्थिक सहकार्यापासून व्यावसायिक मार्गदर्शनापर्यंत विविध लाभ होत आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि उपयोग
‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत व विशेषत: लघु-उद्योग क्षेत्रातील स्टार्टअप क्षेत्राला उपयुक्त तंत्रज्ञान व संगणकीय पद्धतींचा मोठा लाभ या क्षेत्राला अल्पावधीत व तुलनेने मोठ्या प्रमाणावर होत आहे. या नव्या व अद्ययावत तंत्रज्ञानाने स्टार्टअपची कार्यकक्षा देश-विदेशात रुंदावलेली दिसते.
उद्योजक व उद्योजकप्रधान संस्कृती
स्टार्टअपपूर्व काळात पण भारतात उद्योजक आणि उद्योजकता व त्यातही लघु आणि गृहोद्योगांचे जाळे प्रस्थापित झाले आहे. याला गेल्या दशकात सूक्ष्म व लघु उद्योगांचे विकासावर आधारित जाळे पसरल्याने त्याचा फायदा स्वाभाविकपणे स्टार्टअप क्षेत्राला होत आहे.
नवकल्पना व सृजनशील उद्योजकतेला चालना
लघुउद्योग क्षेत्रांतर्गत स्टार्टअप उद्योग व उद्योजकतेला प्रयत्नपूर्वक चालना देण्यासाठी विशेषत: ‘स्टार्टअप इंडिया’ या नव्या उपक्रमाद्वारे केंद्र सरकारने केवळ विकसनशीलच नव्हे, तर नव्या व सृजनशील उद्योजकतेला चालना दिली. त्याचे दृष्य परिणाम आता प्रकर्षाने दिसतात. याच प्रयत्नांचे पुढील पाऊल म्हणाचे नव्याने स्थापन करण्यात आलेला ‘स्टार्टअप २०’ गट. ‘जी २०’ या जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाखाली या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली असून, त्याचा मुख्य उद्देश ‘जी २०’ सदस्य देशांमध्ये सहकार्याच्या माध्यामातून नव्या, कल्पक व सहकार्यावर आधारित स्टार्टअप उद्योगशीलतेला चालना देणे हा आहे. याद्वारे विविध देशांमध्ये यशस्वी स्टार्टअपच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेचे आदान-प्रदान करण्यासह विविध समस्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे.
सकृतदर्शनी पाहता ‘स्टार्टअप २०’द्वारा जागतिक स्तरावरील उद्योजकांना पुढीलप्रमाणे फायदे होऊ शकतात.
जागतिक स्तरावर समन्वय व सहकार्य
स्टार्टअप उद्योजक समूहाद्वारे ‘जी २०’मुळे व त्याच्या माध्यामातून जागतिक स्तरावर परस्पर संपर्क व सहकार्य साधता येईल. याद्वारे विशेष वा समान क्षेत्रात काम करणारे व समविचारी स्टार्टअप उद्योजक यांचा संपर्क येऊ शकतो. त्याद्वारे उद्योजकतेच्या सहकार्यावर व्यावसायिक विकास साधता येईल, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
स्टार्टअप उद्योजकांना सल्ला व मार्गदर्शन
या नव्या स्टार्टअप व्यवस्थेमुळे देशविदेशातील यशस्वी लघु उद्योजक स्टार्टअप यांना परस्पर प्रयत्न नवे उपक्रम, यशोगाथा, समस्यांची सोडवणूक व ऐवढेच नव्हे, तर सल्लागार आणि मार्गदर्शन आता सहजपणे उपलब्ध होईल. संगणकीय पद्धतीने उपलब्ध होणार्या या मार्गदर्शनाचा लाभ आता जागतिक स्टार्टअप क्षेत्राला ‘जी २०’ मुळे उपलब्ध होणार आहे, हे विशेष.
जागतिक विक्री-व्यवस्थेचे जाळे
स्टार्टअप ‘जी २०’ मुळे उद्योग-व्यवसाय व विक्री व्यवस्थेचे जाळे देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक पातळीवर विस्तारित होणार आहे. यानिमित्ताने आता स्टार्टअप उद्योगांचा व्यवसाय व सेवा यांचे जाळे जागतिक स्तरावर निश्चितपणे वाढणार आहे. यामुळे नवे स्टार्टअप उद्योजक, तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, व्यवसायी आणि इतर मोठे उद्योग या सगळ्यांनाच त्यांचा फायदा होणार आहे.
आर्थिक गुंतवणूक व व्यवहार
‘जी २०’ स्टार्टअप गटामुळे ‘जी २०’ सदस्य देशांबरोबरच जागतिक स्तरावर गुंतवणुकदार व आर्थिक संस्था यांच्याशी संपर्क व्यवहार करणे नव-उद्योजकांना सहजसोपे व उपयुक्त ठरणार आहे. यातून मोठी गुंतवणूक व आर्थिक पाठबळ या मंडळींना वेळेत व वेळेवर उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
स्टार्टअपचा वाढता व्यावसायिक विस्तार
आता स्टार्टअप उद्योगांना जागतिक पातळीवर मोठे व प्रस्थापित व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यातून त्यांच्या व्यवसाय वा सेवांचा व्याप विविध पातळींवर व प्रसंगी दृष्य स्वरूपात होऊ शकतो. त्यांना व्यावसायिक व्यापकता व त्यांच्या उद्योजकतेला अधिक व्यापकता प्राप्त होऊ शकते. अशाप्रकारे यावर्षी ‘जी २०’च्या उपक्रमातून ‘स्टार्टअप-२०’च्या निमित्ताने नवउद्योजकांना नवे व व्यापक दालन जागतिक पातळीवर उपलब्ध झाले आहे. या नया संकल्पनेला उत्साहवर्धक प्रतिसादासह सुरुवात झाली आहे. भारताच्या नेतृत्वाखाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जी २०’चे यशस्वी आयोजन झाले. स्टार्टअप ‘जी २०’ ही त्याचीच परिणती म्हणायला हवी. भारतीय नवउद्योगांसह स्टार्टअपचे प्रस्थापित स्वरूप व प्राबल्य पाहिल्यास आपल्याला यामध्ये यश सहजशक्य आहे.
नजीकच्या भविष्यात स्टार्टअप ‘जी २०’मुळे स्टार्टअप क्षेत्राला प्रथमच औपचारिक स्वरूपात जागतिक आयाम लाभले आहे. उद्यमी प्रयत्नशीलतेला कल्पकतेची साथ यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर लाभेल. भारत-भारतीय मुख्य म्हणजे भारतीय युवकांना या नव्या आव्हानपर क्षेत्रात उतरून आपले भविष्य घडविण्याच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्याचा वेळेत व परिणामकारक पद्धतीने लाभ घेण्यावरच भविष्य आणि भविष्यातील संधी उपलब्ध होणार आहेत.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६