मुंबई : चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
चित्रा वाघ म्हणाल्या, "अत्यंत क्रूरपणे या मुलीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ही इमारत धोकादायक आहे. इमारतीतून या मुलींना इतरत्र हलवण्यात येणार होते. ती एकटी मुलगी चौथ्या मजल्यावर राहत होती. आरोपी धोबी होता. आधी तो इथे धोब्याचं काम करत होता. त्याच्यावर सगळयांचा विश्वास होता म्हणून त्याला वॉचमनचं काम दिलं होतं. मी विद्यार्थीनींशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजर चांगली नव्हती, असं सांगतानाच जो धोब्याचं काम करायचा त्याला वॉचमनचा काम कसं देण्यात आलं? कोणी परवानगी दिली?" असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
"या इमारतीत फक्त ग्राऊंड फ्लोअरलाच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. हा निगलीजन्स कोणाचा? या वॉर्डन आणि अधिकाऱ्यांनी मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी होती. मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात कठोर पाऊल उचलले जातील. त्या माणसाने स्वतः ला संपवलं आहे. पण या प्रकरणाची आता कसून चौकशी करणे गरजेच आहे, असं त्या म्हणाल्या. मंत्री चंद्रकांत दादा पाटील दौऱ्यावर आहेत. पण ते घटनेची अपडेट घेत आहेत."
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचाही समाचार घेतला. सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. मला या घटनेला राजकीय वळण द्यायचं नाही. पण मोठ्या नेत्या अशा घटनेमध्येही राजकारण कसं आणू शकतात? एका लेकीचा जीव गेला आहे. सुप्रियाताई संवेदनशीलता बाळगा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.