‘त्या’ प्रकरणी हल्लेखोराने फेसबुकवर दिली होती आझाद यांना धमकी!

29 Jun 2023 17:36:51
Chandrashekhar Azad Attack

लखनौ : ‘भीम आर्मी’ या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर दि. २८ जून रोजी उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. ते कारने देवबंदला जात असताना अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले. त्यावेळी माझ्यासोबतच्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखल्याचे आझाद यांनी सांगितले होते. त्यावरूनच पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. अमेठी येथून विमलेश सिंह नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून जीवे मारण्याची धमकी दिली होती. हल्ल्यातून बचावल्यानंतर आरोपीने 'चंद्रशेखर पुन्हा जिवंत राहणार नाही', अशी पोस्ट टाकली होती. जामो पोलीस तरुणाची चौकशी करत आहेत.

अमेठीच्या क्षत्रियाच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये चंद्रशेखर यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. त्यात लिहण्यात आले होते की, "चंद्रशेखर रावणचा वध ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्यांना अमेठीचे ठाकूरचं मारतील. तेही भरदिवसा चौकाचौकात." हल्ल्यानंतर त्याच फेसबुक आयडीवरून आणखी एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये ‘भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला केला पण रावण यांच्या कमरेला गोळी लागली. त्यामुळे ह्यावेळी वाचला पण पुढच्या वेळी नाही" , असे लिहले होते.

या प्रकरणी अमेठीचे एसपी डॉ. इलामरन यांनी सांगितले होते की, व्हायरल पोस्टबाबत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी अमेठीमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्याबाबत फेसबुक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. चौकशीनंतर याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल.


Powered By Sangraha 9.0