राष्ट्रनिर्माणाचे प्रणेते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

02 Jun 2023 19:24:45
Narendra Modi Chhatrapati Shivaji Maharaj

नवी दिल्ली
: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक दिन प्रत्येकासाठी नवी चेतना आणि नवी ऊर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक काळातील एक विशेष अध्याय आहे आणि त्यातील स्वराज्य, सुशासन आणि समृद्धीच्या महान गाथा आजही आपणा सर्वांना प्रेरणा देतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन कार्यक्रमास संबोधित करताना केले.

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यात स्वराज्य आणि राष्ट्रवादाची भावना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच भारताची एकता आणि अखंडता कायम राखण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. आज एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे नागरिकांचा आत्मविश्वास खचला होता. आक्रमणकर्त्यांनी केलेले आक्रमण आणि शोषणामुळे समाज कमकुवत झाला होता. आपल्या सांस्कृतिक केंद्रांवर हल्ला करून लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवून लोकांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 'स्वराज्या'ची स्थापना केली आणि 'सुराज्य'ही साकार केले असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी लहान वयातच किल्ले जिंकून आणि शत्रूंचा पराभव करून आपल्या सैन्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली, तर दुसरीकडे राजे या नात्याने सार्वजनिक प्रशासनात सुधारणा राबवून सुशासनाचा मार्गही दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संस्कृती आणि वारसा यांना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर संदेश दिला, ज्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्यात स्वावलंबनाची भावना जागृत झाली. या सर्व कारणांची परिणीती जनतेमध्ये राष्ट्राप्रती आदर वाढण्यात झाली असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

शेतकरी कल्याण असो, महिला सबलीकरण असो, किंवा सामान्य माणसासाठी प्रशासन सुलभ बनवणे असो, असे सांगत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन प्रणाली आणि त्यांची धोरणे आजही तितकीच सुसंगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आज आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारताची सागरी क्षमता ओळखून, नौदलाचा विस्तार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

छत्रपतींच्या प्रेरणेतूनच नौदलाचा नवा ध्वज

छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेली प्रेरणा घेऊनच, गेल्या वर्षी भारताने नौदलाला गुलामगिरीतून मुक्त केले आणि ब्रिटीश राजवटीची ओळख असलेला भारतीय नौदलाचा ध्वज शिवाजी महाराजांच्या प्रतीकाने बदलण्यात आला आहे. हा ध्वज समुद्र आणि आकाशात नवीन भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे”, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचारधारा आणि न्यायाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, धोरणात्मक कौशल्ये आणि शांततापूर्ण राजकीय व्यवस्था आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.


Powered By Sangraha 9.0