"बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहू शकत नाही"

18 Jun 2023 15:30:05
Pravin Darekar ON Uddhav Thackeray

अकोला : शिवसेना ठाकरे गटाला वर्धापन दीनाआधीच गळती लागली आहे. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची विचारधारा काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवल्याने शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कास धरतील किंवा भाजपाचा झेंडा हाती घेतील, अशी घणाघाती टीका आ. प्रविण दरेकर यांनी केली.

अकोला येथे माध्यमांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा नेता किंवा शिवसैनिक हा फार काळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवली, शरद पवारांच्या ओंजळीने पाणी प्यायला लागले त्याचवेळेला शिवसैनिक अस्वस्थ झाला. त्यातूनच एकनाथ शिंदे बाजूला झाले व आमच्यासोबत सरकार स्थापन केले. आता उरली सुरली मंडळीही उद्धव ठाकरे यांच्यात बदल होईल, हिंदुत्वाची भुमिका घेत शिवसेना पुन्हा नव्याने उभी करतील अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने येरे माझ्या मागल्या अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची व त्यांच्या ठाकरे सेनेची स्थिती असल्याने राहिलेले चांगले नेते व कार्यकर्ते एकतर शिंदे यांची कास धरतील किंवा भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतील.

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल औरंगजेबच्या मजारचे दर्शन घेतले यावर बोलताना दरेकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा अपमान आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी भुमिका स्पष्ट करावी. कारण प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन आपले सहयोगी सदस्य पक्ष बनविण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचे नाते आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भुमिका काय? हे जनतेसमोर यायला हवे ही आमची मागणी आहे.
 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दरेकर यांनी टिकास्त्र सोडले. दरेकर म्हणाले की, आपल्यात असले की सोने, हिरा आणि दुसऱ्याकडे गेले की कचरा होते. संजय राऊत कचऱ्यासारखे बोलत, वागत आहेत. त्यामुळे त्यांनाही आजूबाजूला कचराच दिसतो. आपला पक्ष रसातळाला गेला त्याची काळजी त्यांनी करावी. ग्रामपंचायत, नगरपरिषदा ज्याज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातील जनतेने प्रथम क्रमांक भाजपाला दिला. आपला पक्ष कुठे चाललाय त्याचे राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे उरली सुरली ठाकरे सेना संपवण्याची आपण सुपारी घेतलीत की काय? त्यामुळे ते अशा प्रकारची बेताल, बिनबुडाची वक्तव्ये करत असल्याचा घणाघातही दरेकर यांनी केला.



Powered By Sangraha 9.0