देवेंद्रजी आणि माझी दोस्ती फेविकॉल का जोड! तुटेगा नही : एकनाथ शिंदे

15 Jun 2023 14:58:30
पालघर : "आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो, तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. पालघरमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा कार्यक्रम पालघरमध्ये पार पडला.
 
 
Eknath Shinde
 
शिंदे पुढे म्हणाले, "देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला आहे. थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र पुन्हा नंबर वन झाला. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलं. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतले." असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
"सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी चकरा मारायला लागू नये म्हणून सरकारने संकल्प केला. निर्णय लोकांपर्यत पोहोचवा यासाठी हा खटाटोप आहे. लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप झालं. आधुनिक शेतीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानासाठी आपण काम करत आहे. मी आणि उपमुख्यमंत्री सुरुवातीच्या मंत्रिमंडळात होतो. आम्ही सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पूर्वीची कॅबिनेट आणि आताच्या कॅबिनेटमध्ये आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत. 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. हे सरकार 10 ते 11 महिन्यापासून स्थापन झाले त्याचा उद्देश एकच आहे, बदल घडवणे. आपण 300 ते 400 निर्णय घेतले. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून आपण निर्णय घेतले."
 
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. पण त्या योजना लोकहिताच्या होत्या. मात्र आता डबल इंजिन सरकार सत्तेत आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही. आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या. राज्याला विकासाच्या वाटेवर आणलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0