‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंत सहस्रबुद्धे यांचे दि. २ जून रोजी निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा आज, सोमवार, दि. १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील राजा शिवाजी विद्यालय, बी. एन वैद्य सभागृह, गेट क्रमांक १२, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ‘विज्ञान भारती’तर्फे प्रकाशित ‘विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा’ या पुस्तकातील जयंत सहस्रबुद्धे यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेल्या लेखाचा संपादित अंश प्रसिद्ध करीत आहोत.
विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांमध्ये भारतात एकाहून एक सरस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांच्या संशोधनाने शास्त्राची दिशाच बदलून टाकली. हे सारे असे अचानक कसे काय घडून आले, याचे रहस्य उलगडून सांगताना प्रख्यात अवकाशभौतिकीतज्ज्ञ ‘नोबेल’ विजेते डॉ. एस. चंद्रशेखर एकदा म्हणाले होते की, “राष्ट्राच्या आत्मप्रकटीकरणाच्या, आम्ही कुठेही कमी नाही हे विज्ञानासाकट जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाश्चात्त्य जगताला दाखवून देण्याच्या एका अनिवार ऊर्मीने हे सारे घडवून आणले...” हे उत्तर पाश्चात्त्यांच्या भारतीयांप्रति असलेल्या भेदभावपूर्ण आणि एकाधिकारशाहीच्या वागणुकीवर बोट ठेवतानाच भारतीय शास्त्रज्ञांमधील देशभक्तीची भावना आणि दमनकारी वसाहतवादी शक्तींविरोधातल्या स्वातंत्र्यलढ्यात सैनिक म्हणून उतरण्याच्या मानसिकतेची झलक दाखविते. ही वस्तुस्थिती असताना आजही आपला समाज या शास्त्रज्ञांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून गौरवण्यास फारसा तयार असलेला दिसत नाही. असे का?
खरे तर, भारताची सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ब्रिटिशांनी ’विज्ञाना’चा कसा वापर केला, पारतंत्र्यात भारतातल्या वैज्ञानिक जगतात भेदभावपूर्ण आणि दमनकारी धोरणे कशी राबवली गेली, अशा धोरणांना विरोध कसा झाला आणि त्यावरची प्रतिक्रिया कशा हुशारीने दिली गेली, याचे बरेच तपशील कागदोपत्री पुराव्यांसह आता उपलब्ध झाले आहेत. आता वैज्ञानिक जगतातला हा स्वातंत्र्यसंग्राम प्रकाशात आणला जायला हवा आणि उत्तुंग वैज्ञानिक शोधांनी स्वातंत्र्यप्राप्तीची ऊर्मी भारतीयांच्या मनात कशी जागवली,याच्या कहाण्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी सर्वसामान्यांना सांगितल्या जायला हव्यात.
प्रबुद्ध भारतीयांची दूरदृष्टी
भारतीय स्वातंत्र्याची कथा ही पिढ्यान्पिढ्यांच्या कठोर संघर्षाची, लक्षावधी भारतीयांच्या अदम्य धैर्याची, अपरिमित त्यागाची आणि अतुलनीय शौर्याची कथा आहे. आपल्यावर त्यांचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे. म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीच्या या ७५व्या वर्षात अशा नाम-अनाम वीरांचे स्मरण करणे, त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे हे नायक नुसते योद्धेच नव्हते, तर ते एका प्रबुद्ध समाजाचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या परमपावन मातृभूमीचा संदेश सार्या जगात नेला. घृणास्पद आघातांनी पिचलेल्या जगातल्या प्राचीनतम पण सर्वोत्तम जीवंत संस्कृतीची मशाल त्यांनी पेटती ठेवली आणि हे करतानाच आपल्या मातृभूमीच्या स्वर्णीम पुनरुत्थानाचे भव्यदिव्य चित्र त्यांनी रेखाटले. स्वातंत्र्यसंग्रामातील वैचारिक घुसळणीतून ही दृष्टी विकसित होत गेली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही दृष्टी समजून घेण्याची, तिचा अभ्यास करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या ऐतिहासिक संघर्षाची गाथा नीटपणे समजून घेण्याची ही वेळ आहे. केवळ आपल्या वर्तमानासाठीच नव्हे, तर देशाच्या भवितव्यासाठीसुद्धा या ऐतिहासिक संघर्षाबाबतचा योग्य दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे आहे.
भारतावरील ब्रिटिश आक्रमणाचे वेगळेपण
इतिहासाच्या अभ्यासकांनी विविध आक्रमणांचा अभ्यास करून प्रत्येक आक्रमणामागे अमर्याद सत्ताकांक्षा, धर्म अथवा संस्कृतीचा प्रसार आणि संपत्तीची लूट या तीनपैकी एखादा मुख्य हेतू असल्याचे दाखवून दिले आहे. भारतावर झालेल्या अनेक आक्रमणांपैकी शेवटचे आक्रमण इंग्रजांचे होते. इंग्रजांच्या आक्रमणामागेही हेच तीन हेतू होते; मात्र त्यांची योजना, पद्धत आणि हत्यारे त्यापूर्वीच्या आक्रमणांपेक्षा अगदी वेगळी होती. पद्धती आणि हत्यारांमधील त्यांचे वेगळेपण इंग्लंडमध्ये नव्याने उदयाला आलेल्या विज्ञानामुळे शक्य झाले होते. सुरुवातीला ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या रूपाने आणि नंतर राणीच्या नावाने होत गेलेल्या ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारामागे इंग्लंडमधल्या वैज्ञानिक प्रगतीचाच हात होता. कदाचित त्यामुळेच त्यापूर्वीच्या सर्व आक्रमणांच्या तुलनेत इंग्रजांचे आक्रमण परिणाम आणि विस्तार या दोन्ही अंगांनी अधिक व्यापक आणि अधिक विनाशकारी होते.
भारतातल्या इंग्रजी राज्याची सुरुवात १७५७ ला प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबावरील विजयाने झाली. योगायोगाने इंग्लंडमधल्या औद्योगिकीरणाची सुरुवातही त्याच सुमाराला म्हणजे १७६० साली झाली. बंगालच्या राजकारभारात नव्याने मिळू लागलेले महत्त्व ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या पथ्यावर पडले. त्यांनी त्यातून अमाप नफा कमावला. हा सारा नफा इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीसाठी भांडवल म्हणून वळवला गेला. उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला दुसरा घटक म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती. भारतातल्या नैसर्गिक साधनसंपदेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने किंचितही वेळ न दवडता १७६७ मध्ये ’सर्व्हे ऑफ इंडिया’ची स्थापना केली. अशा पद्धतीने प्रथमच भारताच्या साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी विज्ञानाचा वापर केला गेला. ही लूट किती प्रचंड होती, याचे एक प्रमाण आता उपलब्ध झाले आहे. १७५७ नंतरच्या १९० वर्षांच्या काळात इंग्रजांनी भारतातून ४५ लाख कोटी पौंड एवढ्या संपत्तीची लूट केली.
भारताची ओळख पुसून टाकण्याचे कारस्थान
पण, संपत्तीची लूट एवढाच काही इंग्रजी साम्राज्याचा हेतू नव्हता. ’ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ ब्रिटिश एम्पायर’मध्ये साम्राज्याच्या कितीतरी ’उच्चतम’ हेतूंची नोंद आहे. उदाहरणार्थ, पाचव्या खंडाच्य प्रस्तावनेत मुख्य संपादक रॉजर लुईस याने लिहून ठेवले आहे की, “इंग्लंडच्या सांस्कृतिक वर्चस्वाबद्दल मेकॉलेची मते आढ्यतापूर्ण असली तरी प्रातिनिधिक होती आणि इंग्रजी शासनामुळे भारताला आणि इतरांनाही लाभच झाला,” असे त्याचे मत होते. त्याने १८३५ साली भारतात लिहिलेल्या ’मिनट ऑन एज्युकेशन’ने ब्रिटिश राजकारणाचे वास्तव उघडे पाडले. तो म्हणतो- “आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीनिशी या सार्या लोकांना शिक्षित करणे निव्वळ अशक्य आहे. म्हणून आपण सद्यःस्थितीत असा एक वर्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे की, जो आपण आणि ज्यांच्यावर आपण राज्य करतो, त्या लक्षावधी लोकांदरम्यान दुभाष्याचे काम करेल, जो वर्ग रक्तामासांने रंगाने तर भारतीय असेल; पण अभिरुची, मते, नीतिमत्ता आणि बुद्धी अशा सर्वांगांनी इंग्रज असेल.” यावरून हे अगदी स्पष्ट होते की, इंग्रजी राज्याचा एक ’उच्चतम’ हेतू भारतीय ओळख पुसून टाकून त्या ठिकाणी इंग्रजी कल्पना आणि आदर्शाची स्थापना करण्याचाही होता. हा तर राष्ट्राच्या ’स्व’वरचाच आघातहोता.
इंग्रजांच्या बौद्धिक श्रेष्ठत्वगंडाला आव्हान
इंग्रजांच्या बौद्धिक श्रेष्ठत्वगंडाला आव्हान देणाराशंख विज्ञानाच्या क्षेत्रात लवकरच फुंकला गेला. कोलकात्यातील यशस्वी वैद्यक व्यावसायिक आणि विज्ञानाची आवड असलेले विद्वान गृहस्थ म्हणून ओळखलेजाणारे डॉ. महेंद्रलाल सरकार यांना पाश्चात्त्य विज्ञानातून आलेल्या इंग्रजी श्रेष्ठत्वगंडाचा अनुभव आला आणि या अन्यायाच्या विरोधात उभे ठाकताना त्यांनी स्वदेशी वैज्ञानिक संस्थेचा पाया घातला. समविचारी भारतीय देणगीदारांच्या आश्रयाने त्यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ (आयएसीएस) या ’संपूर्णपणे स्थानिक आणि विशुद्ध राष्ट्रीय’ संस्थेची स्थापना केली. ’विज्ञान’ हे राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे अमोघ साधन आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि भारतात विकसित झालेल्या विज्ञानाच्या आधारे संपन्नतेच्या शिखरावर पोहोचलेल्या भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. स्वदेशी भाव जागवणार्या या विज्ञान चळवळीने अनेक युवा मनांना साद घातली. त्यातूनच जागतिक दर्जाच्या संशोधनाने आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात आपली छाप उमटवणार्या आणि इंग्रजांच्या बौद्धिक श्रेष्ठत्वगंडाला आव्हान देणार्या तरुण भारतीय शास्त्रज्ञांची पिढीच तयार झाली. ‘आयएसीएस’मधून निपजलेल्या देशाभिमानी शास्त्रज्ञांच्या या पिढीचे अग्रणी होते सर सी. व्ही. रामन या नावाने परिचित असलेले डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण.
आधुनिक विज्ञानातील भरीव कामगिरीबद्दल १९३० साली ज्याला ‘नोबेल’ पारितोषिक दिले गेले, असा पहिला अश्वेत शास्त्रज्ञ. आधुनिक काळातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून सुपरिचित असलेले आचार्य जगदीशचंद्र बसू (बोस) यांनी भारतीयांच्या अफाट बौद्धिक क्षमतांचा परिचय पाश्चात्त्यांना करून दिला. एक देशभक्त या नात्याने पहिला ’सत्याग्रह’ त्यांनी केला. १८८४ मध्ये भौतिकशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन, त्यातही उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन, ते इंग्लंडहून भारतात परतले तेव्हा त्यांची स्वाभाविकपणे भौतिकशास्त्राचे अध्यापन करण्याची इच्छा होती आणि याच ठिकाणी इंग्रजांच्या श्रेष्ठत्वगंडाचा फटका त्यांना बसला. शैक्षणिक क्षेत्रात ‘इम्पिरिअल सर्व्हिस’ आणि ‘प्रोव्हिन्शिअल सर्व्हिस’ असे दोन भाग त्या काळी असत. ‘इम्पिरिअल सर्व्हिस’ ही केवळ इंग्रजांसाठी होती, तर ‘प्रोव्हिन्शिअल सर्व्हिस’मध्ये भारतीयांचा भरणा असे. दोन्हीकडे नियुक्त शिक्षकांची कामे आणि जबाबदार्या सारख्याच प्रकारच्या असल्या तरी त्यांना मिळणार्या वेतनात कमालीची तफावत होती.
भारतीय प्राध्यापकांचे वेतन इंग्रज प्राध्यापकांच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश असे. बसूंची योग्यता जाणाणार्या गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन यांनी त्यांना प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये ‘इम्पिरिअल सर्व्हिस’अंतर्गत मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यावर, आधुनिक विज्ञानाच्या पद्धती समजून घेण्याची क्षमता भारतीयांमध्ये नसते, असा आक्षेप घेतला. पुढे काम सुरू केल्यावर बसूंच्या असेही लक्षात आले की, मानद प्राध्यापक म्हणून नियुक्ती केलेली असल्याने त्यांना निम्मेच वेतन दिले जाते आहे. म्हणजे त्याच दर्जाच्या अन्य ब्रिटिश प्राध्यापकांच्या तुलनेत जेमतेम एक तृतीयांश. हे लक्षात आल्यावर आचार्य बसूंनी सत्याग्रह सुरू केला. त्याबद्दल लिहिताना त्यांचे चरित्रकार पॅट्रीक गॅडेस म्हणतात, “अगदी सुरुवातीपासूनआपल्याकडून जे-जे अपेक्षित आहे, त्यापेक्षा काकणभर सरस कामगिरी करण्याचा मार्ग अनुसरण्याचे त्यांनी ठरविले होतेच; मात्र त्याचसोबत भारतीय प्राध्यापकांचा दर्जा उंचावण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याचाही त्यांचा निर्धार होता. व्यक्तिगत अभिमान आणि सहकारी देशबांधवांप्रति असलेल्या या त्यांच्या निष्ठेतून एक आगळे आंदोलन सुरू झाले, जे त्यांनी अत्यंत काटेकोरपणे सातत्याने सुरू ठेवले.
आपल्या पगाराला हातही न लावण्याचे त्यांनी ठरवले आणि पुढची तीन वर्षे पगार न घेताच, आपले अध्यापनकार्य सुरू ठेवले. या अहिंसक सत्याग्रहासमोर अखेर इंग्रज अधिकारी झुकले आणि त्यांच्यासोबत होत असलेला भेदभाव संपला. पुढे त्यांनी वैज्ञानिक संशोधनाकडे मोर्चा वळवला. ब्रिटिश धोरणे त्याला अनुकूल नव्हती; पण, अशी आव्हाने जणू त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देत. १८९५ मध्ये त्यांनी एक असा शोध लावला, ज्यामुळे आधुनिक विज्ञानातबिनतारी संदेशवहनाचे युग सुरू झाले. बसू यांच्या त्या संशोधनाने आधुनिक विज्ञानाचे दीपस्तंभ म्हणू गणले जाणारे लॉर्ड केल्विन हेही खूप प्रभावित झाले होते. बसूंना व्यक्तिगत मानसन्मानाची अपेक्षा नव्हती, तर आपल्या संशोधनातून भारतीयांच्या विज्ञानविषयक क्षमतांना मान्यता मिळावी, अशी त्यांच इच्छा होती. भारतातील प्राचीन शास्त्रीय परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक अशा आधुनिक विज्ञान संस्थेची उभारणी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. शास्त्रीय संशोधनातून भारतमातेला तिचा सन्मान पुन्हा प्राप्त करून देण्याचे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले होते. राष्ट्रवादी प्रेरणांनी त्यांचे मन भारून गेले होते.
बसूंचे जिवलग मित्र असलेले आणि त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रीय भावनेतून विज्ञानाच्या अभ्यासात स्वतःला झोकून देणारे दुसरे श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणजे आचार्य प्रफुल्लचंद्र राय. भारतीयांची अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांनी रसायनशास्त्रात भारतीयांनी केलेल्या प्रगतीची आणि त्याच्या आधुनिक रसायनशास्त्राच्या विकासात असलेल्या योगदानाची माहिती देणारे ’अ हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री’ नावाचे पुस्तक लिहिले. अशाच प्रकारे देशबांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्याच्या उद्देशाने त्यांनी १९०१ मध्ये ‘बेंगॉल केमिकल अॅण्ड फार्मस्युटिकल वर्क्स’ या नावाने एक उद्योगच उभा केला. “देशाचा बौद्धिक (वैज्ञानिक) आणि औद्योगिक विकास पूर्ण झाल्याशिवाय राजकीय प्रबोधन घडून येण्याची मुळीच शक्यता नाही,” असे त्यांनी एकदा म्हटले होते.
ते क्रांतिकारकांना स्फोटके बनवायला मदत करत. त्यामुळे तर ब्रिटिश दप्तरांत ’शास्त्रज्ञाच्या वेशातला क्रांतिकारक’ म्हणून त्यांच्या नावाची नोंद आढळते. डॉ. महेंद्रलाल सरकार, जगदीशचंद्र बसू आणि प्रफुल्लचंद्र राय यांच्याप्रमाणेच अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे अनेक लढे दिले. त्यांच्या कामगिरीचे खरे मूल्यमापन करता येणेही कठीण आहे. अशा सर्व लढवय्या वैज्ञानिकांच्या योगदानाचे स्वतंत्र भारतात कायमच कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाईल. मात्र, त्याही पलीकडे जाऊन देशाभिमानासाठी वैज्ञानिक संशोधनाचा मार्ग चोखाळणार्या या लढवय्या शास्त्रज्ञांनी पाहिलेले स्वतंत्र भारताचे स्वप्न आपण समजून घेऊ शकलो, त्यांचा मार्ग अनुसरत त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करू शकलो, तर तोच त्यांचा खरा सन्मान ठरेल.
जयंत सहस्रबुद्धे
(साभार : विज्ञान भारती, कोकण प्रांत)