मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असून आज स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मोठा जल्लोष करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाचा ३५० वा सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री आणि अनेक लोकप्रतिनिधी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
किल्ले रायगडावर राज्याभिषेकाच्या निमित्ताने १ जून ते ७ जून या कालावधीत भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत गडावर लाखो शिवभक्त आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रायगड किल्ला परिसरात सात दिवसांसाठी तब्बल २ हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले रायगडाला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.