नाशिक : निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फुस लावून परराज्यात नेण्यात आले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करत मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असून मुलीचे अपहरण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी खा. किरीट सोमेय्या यांनी केली. सोमय्या यांनी गुरुवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत कारवाईची अशी मागणी केली.
सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, निफाड तालुक्यातील नुकतीच १८ वर्षे पूर्ण झालेल्या एका मुलीला गावातीलच २४ वर्षीय विवाहित तरुणाने व फुस लावून अजमेर येथे नेले. तेथे या मुलीला तावीज बांधले. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास करून ४८ तासात मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. मात्र तरुणीस फुस लावून नेणाऱ्या युवकावर कठोर कारवाई केली पाहजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असून याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यावेळी आ. देवयानी फरांदे, भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.