नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीच्या पूजेच्या अधिकाराची विनंती करणाऱ्या हिंदू पक्षाची याचिका सुनावणीयोग्य असल्याचे स्पष्ट करून मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे.
ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची नियमित पूजाअर्चना करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षाने वाराणसी न्यायालयातक दाखल केली होती. मात्र, ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे सांगून मुस्लिम पक्षाने याचिकेच्या मेंटेनिबिलीटीस आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना जिल्हा न्यायाधीश डॉ. ए. के. विश्वेश यांनी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करून २३ डिसेंबर २०२२ रोजी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने बुधवारी निकाल जाहिर करून हा खटला सुनावणीयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे आणि मुस्लिमांची याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या प्रकरणात, वादग्रस्त मालमत्तेमधील श्रृंगारगौरी, भगवान गणेश आणि भगवान हनुमानाची पूजा करण्याचा हक्क वादी मागत आहेत, त्यामुळे दिवाणी न्यायालयाला या प्रकरणाचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १९९३ पर्यंत बराच काळ वादग्रस्त जागेवर माँ शृंगार गौरी, भगवान हनुमान, भगवान गणेशाची पूजा करत होते. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी करण्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भव्य शिवमंदिराची उभारणी आता दूर नाही :अॅड. हरि शंकर जैन, हिंदू पक्षाचे वकील
न्यायालयाचा आजचा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून या संपूर्ण प्रकरणात मैलाचा दगड ठरणार आहे. वर्तमान वादग्रस्त ढाचा हटवून भव्य शिवमंदिराची उभारणी करण्याचा दिवस आता फार दूर राहिलेला नाही. अनेक शतकांपासून हिंदू समाज यासाठी संघर्ष करत आहे. या प्रकरणात प्रार्थनास्थळ विशेष कायदा लागू असल्याचा दावा मुस्लिमांनी केला आहे. मात्र, प्रथम वाराणसी दिवाणी न्यायालय आणि आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावून हिंदूंचा दावा मान्य केला आहे.