...म्हणुन शरद पवारांसमोर सुषमा अंधारेंना अश्रु अनावर झाले!

09 May 2023 17:56:00
 
sushma andhare
 
 
मुंबई : साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांना अश्रू आवरत नव्हते. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांना अश्रु अनावर झाले.
 
पुढे त्या म्हणाल्या, "मला भटक्या विमुक्तांच्या काही व्यथा मांडायच्या नाहीत. पण जागतिकीकरणात भटके जास्त विस्थापित झाले आहेत. इतक्या जाती आहेत तर काहींना अशीपण जात आहे का? असं आश्चर्य वाटते. सध्या शहरातील लोकांना वयाच्या पाचव्या, सहाव्या वर्षात संगणक हाताळायला मिळत आहे. पण यांना कुठे ते कळतं? मी माझे एमए शिक्षण पूर्ण केल्यावर मला कम्प्युटरचा डबा पाहायला मिळाला. भटक्या जातीतील अनेक लोकं आहेत की जी संधी मिळाली की मोठी होतात."
 
"आमचा असाही कोणी आधार नाही. आम्ही मंत्रीपद वैगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलो नाही. भटक्यांना आधार असावा, आमचे प्रश्न मांडणारं कोणीतरी असावं यासाठी आलो आहोत. सगळे बोलतात माझ्या बोलण्यात रग आहे. याचं कारण माझ्यात धग आहे. पण लोक माझ्या बापापर्यंत जातात, वाटेल ते बोलतात."
 
"ज्या जमिनीत मी उगवून आले ती कसदार आहे आणि आम्ही दमदारपणे उगवून आलो आहोत." यावेळी सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. हे पत्र वाचून दाखवताना देखील त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब तुमची महाविकासआघाडीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच माझं संपूर्ण कुटुंब आज तुमच्यामुळे सुरक्षित आहे असं देखील त्या म्हणाल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0