अनिल नावाचा अभ्यासपूर्ण किल्लेदार

07 May 2023 17:42:32
Anil Dudhane

गडकिल्ले, वीरगळ, शेती अशा अनेक विषयांत रमलेल्या आणि अभ्यासपूर्ण शोधकार्य केलेल्या अनिल दुधाणे यांच्याविषयी...

भारतीय शेतकरी आपल्या शेतात फार मेहनत घेतो, मग त्याच्या कष्टाळू हातांची किमया जमिनीतून उभारून येते. सातार्‍याजवळील खिंगर येथे एका छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात अनिल दुधाणे यांचा जन्म झाला. त्यांनी विज्ञान विषय घेऊन बारावीनंतर ‘आयटीआय’ पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षणही झाले. शिकतानाच त्यांना महाराष्ट्र, गुजरात तसेच राजस्थानमधील गडकिल्ले पाहण्याची व इतिहासाचा अभ्यास करायची ओढ लागली. जर्मन शेतकर्‍यांशी विचारविनिमय करून शेतीविषयातील नवं तंत्रज्ञान वापरून त्याचे प्रयोग आपल्या शेतीत केले. तसेच,त्यांनी वीरगळ व सतीशिळा या विषयांवर अनेक प्रबंध लिहून त्यांचे जाहीर वाचनही केले.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू झाली. परंतु, गड-किल्ल्यांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. सुट्टीच्या दिवशी किल्ले पाहता पाहता त्यांनी संपूर्ण सह्याद्री पिंजून काढला. विदर्भातले काही किल्ले सोडले, तर त्यांचे महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहून झाले आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांची एकूण संख्या ३९८ आहे. त्यापैकी अनिल दुधाणे यांचे ३८५ किल्ले पाहून झाले आहेत. तसेच, राजस्थानमधील २३० किल्ल्यांचा आणि गुजरातमधल्या ११८ किल्ल्यांचा अभ्यास झाला आहे. तसेच, मध्य प्रदेशातीलही २०० च्या आसपास किल्ल्यांचा अभ्यास त्यांनी केला आहे.
 
प्रमोद मांडे यांच्याशी भेट याच भटकंतीदरम्यान झाली. या भेटीने त्यांचा किल्ल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एखादी भेट आपला दृष्टिकोन बदलू शकते तसंच एखादा विशिष्ट दृष्टिकोन आपले आयुष्य बदलू शकतो. किल्ले बघताना त्यांचा खर्‍या अर्थाने अभ्यास सुरू झाला. त्यांना काही शिल्प किल्ल्यांवर सापडली. काही पायथ्याशी, गावात, जी पूर्णपणे दुर्लक्षित होती. बारव, पुरातन अवशेष, जुन्या बांधणीच्या पडक्या वास्तू, जुनं मंदिर किंवा फुटलेली मूर्ती. हे सर्व शोधताना अनिल यांनी सहज म्हणून त्यांचे फोटो घेऊन ठेवले होते.

बराच छायाचित्रांचा खजिना सापडल्यानंतर त्यांच्या मित्राकडून त्यांचे अर्थ समजून घेतले. तोपर्यंत त्यांना वीरगळ म्हणजे काय हे माहिती नव्हते. वीरगळ एकमेकांपासून वेगळी कशी असते हे पाहताना त्यांनी वीरगळचे वेगवेगळे प्रकार शोधायला सुरुवात केली. हे करतानाच त्यांना फक्त महाराष्ट्रात ४० प्रकारच्या विविध वीरगळ पाहायला मिळाल्या. मुष्टियुद्ध खेळत असलेल्या पुरुष व स्त्रियांची वीरगळसुद्धा सापडल्या आहेत. वीरगळचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जवळपास ९०० गावांना भेट दिली. त्यानंतर पाच दिवसांचे दौरे आखून ‘वीरगळ डॉक्युमेंटेशन’मोहीम सुरू केली. प्रत्येक जिल्ह्यात दौरा आखून दिवसाला सरासरी ४० गावे पाहत, प्रत्येक गावातील वीरगळ शोधून ती धुवून त्याची छायाचित्रे घेत. त्यांनी ‘इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा’ नावाचे पुस्तक लिहिले.

त्यांनी ८० शिलालेख प्रसिद्ध केले. एका वर्षांत १३ ते १४ प्रबंध प्रकाशित केले. कार्यालयीन काम त्यांचे सुरूच होते. त्यातूनही एकही दिवसाचा खाडा न करता ही शोधमोहीम सुरूच ठेवली. याबरोबरच गावी मेहेनत घेणार्‍या शेतकर्‍यांचे कष्ट त्यांच्या डोळ्यातून उतरत नव्हते. गावाकडची जमीन सुपीक, कसदार, शेतकरी पण कष्टाळू परंतु त्याच्या कष्टांची फळे मात्र इतर देशातील शेतकर्‍यांपेक्षा कमी मिळतात. मग विदेशातील शेतकर्‍यांशी चर्चा करून अनेक नव्या पद्धती शिकून घेतल्या. माती विरहित शेती करून सह्याद्रीच्या कुशीत स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पन्न घेतले. त्यांना सुट्टीचे दिवस खेळण्यात मौजमस्ती करण्यात घालवता आले नाहीत. आई-वडील फार मेहनत घेत ती सतत डोळ्यापुढे असे. मुंबईत नोकरीसाठी आल्यावरही कष्ट दिसायचे. फक्त पाच टक्के पाऊस पडून इस्रायल शेती उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहून त्यांनी एकूण परिस्थिती, वातावरण, मातीचा अभ्यास करून झाल्यावर त्यांनी स्वतः काही मॉडेल्स तयार केले. ज्यायोगे शेतकर्‍यांना कमीत कमी खर्चात कमी वेळेत फार अंगमेहनत न करता उत्त्पन्न घेता आले.
 
गावातील सगळ्या शेतकर्‍यांना प्रयोग करून दाखवले आणि नव्या पद्धती दाखवून दिल्या. ज्या-ज्या भागात आपण भातशेती करतो त्या-त्या भागात आता सगळ्या प्रकारची पिके घ्यायची, असे शेतकर्‍यांना सांगितले. स्ट्रॉबेरी, मलबेरी, ड्रॅगन फ्रुट, ब्रुसबेरी इत्यादी पिकांचे यशस्वी प्रयोग करून ते उत्पन्न घेत आहेत. तसेच हे तंत्रज्ञान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी गावातील सर्व शेतकर्‍यांना शिकवले. मातीविरहित शेती करून शेतकर्‍यांचा वेळ तसेच मेहनत कमी करून उत्पादन वाढवण्यास मदत केली. मातीविरहित शेती तंत्रज्ञानात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याच्या कामगिरीमुळे त्यांना सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘कृषी किमयागार पुरस्कार’, ‘समृद्ध किसान पुरस्कार’, ‘मी मराठी पुरस्कार’, ‘सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’, ‘फिनोलेक्स कृषी पुरस्कार’, ‘सह्याद्री कृषिरत्न पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय सह्याद्री कृषी व सामाजिक पुरस्कार’ त्याचबरोबर शेती आणि इतिहास क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल ‘सातारा भूषण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांचे शेती, गडकिल्ले आणि पुरातत्वविषयक संशोधन असेच पुढे चालत राहो, अशी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0