“कोणतंही काम समर्पित भावनेने आणि झोकून देऊन करा. निसर्गामध्ये रमायला शिका. भौतिक आनंदापेक्षा आंतरिक आनंद अधिक महत्त्वाचा आहे. इतिहास-गड-किल्ले-डोंगरदर्यातील अनवट वाटा-झाडेवेली हा जगावेगळा आनंद देतात...” हे सांगतायत ज्येष्ठ दुर्ग व इतिहास अभ्यासक, लेखक, व्याख्याते प्र. के. घाणेकर. महाराष्ट्राला दोन ‘प्र. के.’ लाभले आहेत. एक प्र. के. अत्रे आणि दुसरे प्र. के. घाणेकर. समर्थ रामदासांच्या ’बहु हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हीत कांही।’ या उक्तीप्रमाणे दुर्गभ्रमंतीपासून ते निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यापर्यंत... व्याख्यानांपासून ते पुस्तकांपर्यंत अशा स्वर्गीय दुनियेची सफर करणार्या या कलंदर मुशाफिराच्या १००व्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ११ मे रोजी होत आहे. यातही विशेष म्हणजे, आज रविवार, दि. ७ मे रोजी प्र. के. घाणेकर वयाच्या ७५ वर्षांत पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे पुणे आवृत्ती प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...
सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपलं शंभरावं पुस्तक प्रकाशित होते आहे. ’जमलं तसं’ असं नाव या पुस्तकाला का द्यावसं वाटलं?
खरं सांगायचं तर मी आयुष्यात ठरवून काहीही कधीही केलं नाही. माझं आयुष्य कायमच प्रवाही राहिलेले आहे. त्याला शिस्त मात्र नक्की होती. आई-वडिलांनी मला भरपूर स्वातंत्र्य दिले. यशापयशाच्या सर्व पातळ्यांवर ते कायम माझ्या पाठीशी राहिले. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये भरपूर अडचणी आल्या. त्यावेळी देखील त्यांनी पाठीवर थाप टाकत यामधून नक्कीच मार्ग काढशील, असं म्हणत कायम पाठिंबा दिला. १९८२ पासून माझा साहित्य लेखनाचा सुरू झालेला प्रवास हा आजवर सुरू आहे. आजवर मी जे काही केलं, ते जसं जमेल तसं केलं. त्यामुळे हे शीर्षक देणे योग्य वाटले.
आपला भ्रमंतीचा प्रवास नेमका कसा सुरू झाला?
खरं म्हणजे वनस्पतीशास्त्र माझ्या डोक्यात आहे आणि इतिहास माझ्या रक्तात आहे. मी दहावी उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर महाविद्यालयात विज्ञान शाखा घेतली. जीवशास्त्रदेखील आवडत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना अत्यंत तळमळीने विषय शिकवीत असे. परंतु, वनस्पतीशास्त्र चार भिंतींमध्ये बसून शिकायचा विषयच नाही, असे माझे कायमच मत राहिलेले आहे. बाहेर जाऊन शिकवायचे असे मी ठरवले. मी विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन वनस्पतीशास्त्र शिकवायला सुरुवात केली. तिथून खरी भ्रमंतीला सुरुवात झाली असे म्हणता येईल.
किल्ले भ्रमंतीची सुरुवात कशी झाली?
वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना मी बाहेर नेऊन शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर सर्वसाधारणपणे काही गोष्टी लक्षात घेतल्या की, तिथे पाणी हवे, किमान प्यायला पाणी मिळायला हवे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही किल्ले निवडले आणि पुणे जिल्ह्यातच फिरायला सुरुवात केली. त्याकाळी किल्ल्यांवरचे पाणी पिण्यालायक होते. विविध लेणी, गिरी मंदिरे आम्ही पिंजून काढली आणि तिथल्या वनस्पतीशास्त्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यातूनच किल्ल्यांविषयी कुतूहल निर्माण झाले.
तुमच्या पुस्तकांमध्ये अन्य पुस्तकांच्या तुलनेत वेगळी माहिती असते. कुठे राहावे इथंपासून जेवणाची व्यवस्था, पाहण्यालायक ठिकाणे याचीही माहिती असते. त्याविषयी काय सांगाल?
गडकिल्ले फिरत असताना काही प्रश्न मला त्यावेळेस पडायचे. ते प्रश्न मनातच राहिले. ‘एमएससी’ झाल्यानंतर नोकरीदेखील मिळाली. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये डॉ. तात्यासाहेब खरे यांच्याशी माझी ओळख झाली. म्हणजे मीच ती करून घेतली. त्यांनी मला किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, किल्ल्यावर जाताना पुस्तके वाचून जावे. मग आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे सांगितले. खरं म्हणजे, माझ्या मनातील किल्लेप्रेम हे तात्यासाहेब खरे यांनीच वाढवले.
पुस्तक लेखनाकडे कसे वळालात?
माझा हिंडण्याचा नाद तसा सुरूच होता. ‘बीओबीपी‘ नावाची एक संस्था होती. त्याचे सभासदत्व मी घेतले आणि त्याचे ट्रेक घेऊन जाणे सुरू केले. त्यामध्ये झाडांची माहिती इतिहास सांगण्यासाठी मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असे. त्यामुळे ट्रेकला येणार्या लोकांची गर्दी व्हायची आणि त्यातही माझ्याच ट्रेकमध्ये येण्यासाठी लोक कायम आग्रही असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३००व्या राज्याभिषेक दिनानिमित्त पर्यटन मासिकात महाराष्ट्रातील किल्ल्यांवर एक सदर मी लिहीत होतो. त्यामध्ये जवळपास ११० एकूण लेख लिहिले. ही लेखमाला ‘स्नेहल प्रकाशना’चे रवींद्र घाटपांडे हे नेहमी वाचायचे. ते मला एकदा भेटले आणि म्हणाले, आपण यावर पुस्तक काढू. त्यावेळी मी त्यांना प्रश्न केला, कोण वाचणार पुस्तक? कारण, नुकसानाची भीती वाटत होती. परंतु, घाटपांडे यांनी पुस्तक काढले आणि हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामुळे रवींद्र घाटपांडे आणि माझे संबंध अधिक दृढ झाले. मला काही लिहावेसे वाटले की, त्यांना विचारायचं हा क्रमच बनला. यातूनच पुस्तके लिखाणाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्यामार्फत माझी बरीचशी पुस्तके येत गेली. माझ्या शंभर पुस्तकांपैकी जवळपास ७० पेक्षा अधिक पुस्तके रवींद्र घाटपांडे यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये मी निसर्ग, हिमालय, पर्यटन, किल्ले या विषयांवर लिखाण केले. रवींद्र घाटपांडे यांना दुसर्यांचे कौतुक करावेसे फार वाटते.
मूर्ती, मंदिरे या विषयांचाही आपला गाढा अभ्यास आहे. या इतिहासाकडे आपण कसे पाहता?
इतिहास खरंतर खूप व्यापक विषय आहे. केवळ लिखित इतिहास एवढाच भाग नसतो, तर त्या इतिहासाला अनेक कंगोरे असतात. इतिहास म्हणजे आपला वारसा. दगड, फुले, डोंगर, झाडे, जीवसृष्टी हा देखील आपला वारसाच आहे. माझ्यावर तात्यासाहेब खरेंचा प्रभाव होता. यासोबतच डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याकडून मंदिरे, मूर्तीशास्त्र, लेणी याच्या अभ्यासात मला अधिक रस निर्माण झाला. म. श्री. माटे हे देखील शिकवायला होते. देगलूरकर सरांसोबत मी भरपूर हिंडलो. मूर्ती, मंदिरे समजावून घेण्याचा वस्तूपाठ त्यांनी मला घालून दिला. त्यातूनच नवीन अभ्यासाचा विषय मला मिळाला. त्यातूनच मी ‘शिल्प समृद्ध कोकण’ नावाचं पुस्तक लिहिलं. अनेक उत्कृष्ट मूर्ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. बुलढाणा येथील मेहकर तालुक्यामध्ये असलेली सारंगधराची मूर्ती ही बालाजीची मूर्ती असून त्रिविक्रम प्रकारातील मूर्ती आहे. त्यानंतर मंदिरे-मूर्ती हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय बनला. मंदिरांचे प्रकार, त्यातील देवता, मूर्तीची वैशिष्ट्ये आणि रचना त्यावरील चितारण्यात करण्यात आलेले बारकावे याचा अभ्यास करणे अलौकिक असते. माझी सर्वात आवडती मूर्ती म्हणजे त्रिविक्रमाची श्रीविष्णू मूर्ती.
आपला सह्याद्रीपण समृद्ध आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल?
मला खरं म्हणजे जाणून घ्यायला आणि ते इतरांना सांगायला अधिक आवडते. आपण सह्याद्रीकडे केवळ सह्याद्रीच्या उदरात असलेल्या किल्ल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. परंतु, सह्याद्रीची जडणघडण कशी झाली? त्याच्यामध्ये भूशास्त्रीय नवलस्थाने कोणती आहेत? त्यामधील गुहा, घाटवाटा, नद्यांची उगमस्थाने, धरणे, धबधबे, जललेणी, पुष्प, कातळखोद चित्रे, निसर्गवैभव या गोष्टींचा देखील आपण सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. गिरीशिखरे हा देखील खूप मोठा कुतूहलाचा विषय आहे.
आपल्याकडे खूप सार्या जुन्या जीवाश्मांचा संग्रह आहे, असे देखील आम्ही ऐकलं आहे. त्याबद्दल आम्हाला थोडसं सांगाल का?
मी विविध गडकिल्ल्यांवर, डोंगरांवर कुठेही फिरायला गेलो तरीसुद्धा मला जरा वेगळ्या वस्तू काही गोष्टी दिसल्या, तर त्या गोळा करण्याचा छंद लागला. माझ्याकडे एक अब्ज वर्षं जुना जिवाश्म आहे आणि पाच ते सहा लाख वर्षं जुनादेखील जीवाश्म आहे. यामध्ये वनस्पती, प्राणी यांच्या जिवाश्मांचा समावेश आहे. यासोबतच विविध प्रकारच्या खडकांचे, दगडांचे अवशेष, शंख हे देखील मी माझ्या संग्रहामध्ये ठेवलेले आहेत.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्यासोबत आपली खास मैत्री होती. त्याविषयी...
निनादजी बेडेकर यांच्याशी माझी ४०-४५ वर्षांची मैत्री होती. इतिहासाने झपाटलेला हा माणूस होता. माझ्या ५०व्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी माझी प्रगट मुलाखत देखील घेतलेली होती. ते कायमच माझ्या आदरस्थानी राहिलेले आहेत.
’रद्दीतील रत्नांचा कुबेर’ असे तुम्ही स्वतःलाच म्हणून घेता. त्याचे कारण काय?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्याकडे ३५ हजारांपेक्षा अधिक वर्तमानपत्रांची कात्रणं आहेत. माझ्या आवडीच्या विषयांवरील वर्तमानपत्रांमधील कात्रणे जमा करण्याची मला सवयच लागली होती. या कात्रणांचा संदर्भ म्हणून पुढे खूप चांगला उपयोग होतो. हल्ली कात्रणे काढणे ही सवय अनेकांना दिसत नाही. परंतु, माझ्याकडे ३५ हजार कात्रणांच्या फाईल्स आज देखील सुस्थितीमध्ये आहेत. कात्रणे जमवणे हा माझा ज्ञानदायी छंद आहे. आवडीच्या विषयांवर मी सतत कात्रणे जमवीत गेलो. पानशेतच्या पुरामध्ये जुनी कात्रणं वाहून गेली. पण, त्यानंतर मी पुन्हा कात्रणे जमविण्यास सुरुवात केली.
आपण आजवर विपुल लेखन केले आहे. व्याख्याने दिली आहेत. त्याकरिता वेळेचे नियोजन कसे शक्य झाले?
मी आजवर दोन हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत, तर तीन हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत आणि १०० पुस्तकांचे लेखन देखील माझ्याकडून झाले आहे. भटकंतीचा छंद जोपासण्यासाठी नोकरीमध्ये मला भरपूर वेळ मिळाला. वर्षभरातील सर्व सुट्ट्या एकत्रित केल्या, तर तीन महिन्यांची सुट्टी मिळायची. नाताळला तर जवळपास एक महिना सुट्टी असायची. त्यावेळी परीक्षांची कामे ऐच्छिक होती. त्यामुळे मी कधीही परीक्षांची कामे केली नाही आणि हा सर्व वेळ मी भटकंतीमध्ये आणि लेखनामध्ये घालवला.
हिमालय हा सुद्धा आपला खूप जिव्हाळ्याचा विषय. आपण गिर्यारोहणदेखील सुरू केले. तर, तो प्रवास नेमका कसा सुरू झाला?
१९७४ साली मी मनाली येथे ‘माउंटनिंग इन्स्टिट्यूट’ ‘डब्ल्यूएचएमआय’चा कोर्स केला. भटकंतीमध्ये साहसी आणि गिर्यारोहणाची साधने शिकवायची. हे सर्व शिकून आलेलो असल्यामुळे मला ते काम करणे सोपे गेले. ‘सह्याद्री मंडळा’मार्फत ट्रेकला घेऊन जाणार्यांना मी ‘क्लायंबिंग’ शिकवतो. आतापर्यंत पंधरावेळा मी हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आलेलो आहे. १९७८ साली ‘एव्हरेस्ट’च्या अगदी जवळ मी जाऊन आलो. लडाख, नेपाळ, हिमालयात देखील मनसोक्त भटकंती केलेली आहे. हिमालयातील जीवाश्म हे माझे कायमच आकर्षण राहिलेले आहे. तेथील वादळ, ऊन, वारा मी जवळून अनुभवला. भूकंप हिमस्खलन अनुभवले. हे सर्व अनुभवताना मला भीती वाटली नाही. हे सर्व मी माझ्या आनंदासाठी केले. संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ’घेतला आनंद... वाटला आनंद... या परिता आनंद कोणता?’ असेच मी म्हणेन. देशभरातील अभयारण्येदेखील मी जवळून अनुभवली आहेत. त्यामुळे माझ्याही ज्ञानामध्ये भर पडली.
आपण महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्यदेखील दीर्घकाळापर्यंत केले. या अनुभवाबद्दल काय सांगाल?
मी जवळपास ३७ वर्षं म्हणजे १९७२ ते २००७ या कालावधीमध्ये नोकरी केली. महाविद्यालयामध्ये प्रचंड ऊर्जा असते. आपण कायमच तरुणांच्या सोबतीमध्ये-संगतीमध्ये असतो. त्यांच्यामध्ये असलेला जोश, उत्साह आणि काहीतरी करून दाखविण्याची त्यांची उर्मी ही मला सतत प्रेरणा देत गेली आणि त्यामुळेच मी देखील तरुणच राहिलो.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्शस्थानी मानता. त्यांच्याविषयी जाणवणारी विशेष गोष्ट कोणती?
‘छत्रपती शिवराय यांचे दुर्गविज्ञान’ हा अफाट विषय आहे. छत्रपती शिवराय हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच ते स्वराज्य निर्माण करू शकले. ‘रायगड समजावून घेताना’ या पुस्तकात आपल्याला त्यांच्या दुर्गविज्ञानाविषयी माहिती मिळू शकेल.
आजची पिढी इतिहासाकडे काहीशी उदासीनतेने पाहताना दिसते. त्यांच्यामध्ये अभ्यासाचा अभाव आहे का?
संत रामदास हे माझे आवडते लेखक आणि ‘दासबोध’ हा माझा आवडता ग्रंथ. समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ’अभ्यासोनी प्रगटावे’ हे सूत्र आपण जपले पाहिजे. नवीन पिढीमध्ये अभ्यास करण्याची जिद्द थोडी कमी पडते. ‘इतिहास’ या विषयाचा अभ्यास करून जर पैसे मिळत असते, तर आयटीमध्ये गेलेली सगळी पिढी ही इतिहासाकडे वळली असती. उत्पन्न आणि पैसा निगडित असल्यामुळे लोक करिअरकडे जास्त लक्ष देतात. आपल्या इतिहास आणि वारसा याच्या अभ्यासाकडे वळत नाहीत. आज इतिहासकार, अभ्यासकांमध्ये उथळपणा आलेला आहे. तो कमी व्हायला हवा असे मला वाटते.
शंभराव्या पुस्तकाच्या आणि वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त मागे वळून पाहताना काय जाणवते?
शेवटी माझे अनुभव हीच माझी श्रीमंती आहे. मी माझ्या आनंदासाठी या सर्व गोष्टी आजवर केल्या आहेत. मी त्याबद्दल कायम समाधानीच आहे. मी माझ्या स्वयंप्रेरणेने या सर्व गोष्टींमध्ये भ्रमत आणि रमत गेलो. आजवर भटकंती केली. गडकिल्ले फिरलो, पुस्तके लिहिली. याचा आनंद निश्चित आहे. समृद्ध आयुष्य जगलो. याची तुलना अन्य कोणत्याही संपत्तीशी होऊ शकत नाही.