अहमदनगर : अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नसणाऱ्या लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले. असा घणाघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच आजही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, "अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लंडग्याला आपण हाकलून लावले आहे. सत्तेचा माज चांगला नसतो. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस आणि प्रशासनच्या नावाखाली कशा प्रकारचे राजकारण केले गेले. शासन आणि पोलीस यांच्या आडून जास्त दिवस राजकारण चालत नसते." असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे राज्यात नऊ दहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. त्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, "गरीब-मराठा शेतकऱ्याचा मुलगा बंड करून महाविकास आघाडीची सत्ता घालवतो, हा राजकारणातील खूप मोठा बदल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले."