मासेमारी बंद होणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची आवराआवर
31 May 2023 14:59:27
रत्नागिरी : राज्य सरकारने मच्छिमार बांधवांना १ जूनपासून मासेमारी बंद राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील मच्छिमार बांधवांनी आवराआवर करण्यास सुरुवात केल्याचे दिसते आहे. शासनाकडून खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळी हंगामीतील मासेमारी दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी १ दिवसांनंतर बंद राहणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आल्या आहेत. शासनाने १ जूनपासून मासेमारी बंद करण्याचे आदेश दिल्याने मच्छीमारी व्यवसाय बंद होणार असल्याने हा हंगाम निराशाजनक ठरला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी बंद होणार असून, मच्छिमारांनी आवराआवर सुरू केली आहे. मच्छिमार नौका किनाऱ्याला आणून लावण्याचे काम सध्या सुरू आहे. यावर्षी सुमारे दोन महिने म्हणजेच ६१ दिवस मासेमारी बंद राहणार आहे. १ ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. जून आणि जुलै हे दोन महिने मत्स्यबीज वाढीचे असल्यामुळे या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यानंतर मच्छिमार बांधवांना पुन्हा मासेमारी करणे शक्य होणार आहे.