मुंबई : ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, ही सध्याच्या शिल्लक सेनेची स्थिती आहे. असे म्हणत भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर खरमरीत टीका केली आहे. संधीसाधू राजकारणाचा कॅांग्रेसचा गुण शिल्लक सेनेच्या नसानसात भरलेला दिसतोय. असं म्हणत त्यांनी कॅांग्रेसवरही निशाणा साधला आहे.
केशव उपाध्येंनी सोशल मिडीयावर व्हिडीओ ट्विट करत म्हटले की, "ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, ही सध्याच्या शिल्लक सेनेची स्थिती आहे. संधीसाधू राजकारणाचा कॅांग्रेसचा गुण शिल्लक सेनेच्या नसानसात भरलेला दिसतोय…संजय राऊतांना कॅांग्रेसची झिंग चढल्याने त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भाजपाने केले, एनडीएने केले. आणि उरला प्रश्न अहंकाराचा, तर तो अहंकार उद्धव ठाकरे आणि शिल्ल्क सेनेत किती ठासून भरलाय हे देशाला माहितीय… " असं म्हणत उपाध्येंनी खासदार संजय राऊतांवर ही निशाणा साधला.
"केवळ स्वतःच्या अहंकारापाई उद्धव यांना वंदनीय बाळासाहेब आणि हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली वाहिली…आणखी मुद्दा लोकशाहीची शोभा वाढविण्याची भाषा शिल्लक सेना करतेय… २०१९ ला महाराष्ट्राने कल देवेंद्रजींच्या नेतृत्वाला दिला होता, हे जगजाहीर आहे. तेव्हा लोकशाहीची हत्या केली आणि आता शोभा वाढवण्याच्या बाता करता?" असा सवाल ही त्यांनी ठाकरे गटाला केला आहे.