मुंबई : खासदार संजय राऊत हे लोकांच्या मनोरंजनाचे साधन झालेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ नाही. संजय राऊत कोट्या करण्याचं काम करतात. असं विधान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. "आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे." अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पुढे लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "दावा करण्याची गरज नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच. २०१९ साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.”