कोलकाता : देशभरात गाजत असलेल्या ’द केरला स्टोरी’ या चित्रपटाला प. बंगाल सरकारने बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दणका देताच हा चित्रपट संपूर्ण राज्यात ‘रिलीज’ करण्यात आला असून, त्याचे सर्व शो हाऊसफूल्ल झाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट ’द केरला स्टोरी’ रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. चित्रपटाच्या कथेवरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. चित्रपटाच्या कथेमुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
त्यानंतर निर्मात्यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आणि तामिळनाडूला चित्रपट पाहणार्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले. एका अहवालानुसार, चित्रपटगृहामध्ये जवळपास सगळेच शो हाऊसफुल्ल आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, ’द केरला स्टोरी’चे संगीत दिग्दर्शक, बिशाख ज्योती मूळचे बोनगावचे आहेत आणि हे जाणून खूप उत्सुक आहेत की सर्व वाद आणि कथित धमकीचे फोन येत असूनही श्रीमा हॉल ’द केरला स्टोरी’ दाखवत आहे.
केरळमधील ३२ हजार हिंदू महिलांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या संशयास्पद दाव्यामुळे चित्रपटाची कथा वादात अडकली होती. पण तरीही ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत आणि चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलाकारांत प्रमुख भूमिकेत असलेल्या अदा व्यतिरिक्त, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानीदेखील चित्रपटात आहेत.