सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्हाला बदलायचंयं : मुख्यमंत्री

25 May 2023 16:03:55
cm Eknath Shinde on Ratnagiri tour

रत्नागिरी
: सरकारी काम आणि सहा महिने थांब ही ओळख आपल्याला पुसून टाकायची आहे. लोकांची छोटी छोटी कामं असतात पण त्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारभाराबद्दल असलेली ही ओळख आपण पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. रत्नागिरीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. तसेच उद्धव ठाकरेंनाही त्यांनी यावेळी 'फेसबूक लाईव्ह'वरुन सुनावले.

एकनाथ शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप लोकं येतात. खुप छोटी छोटी कामं असतात. मात्र, त्यांना तात्कळत ठेवलं जातं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजना पुरवण्याचे काम आपण केले पाहिजे.", असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी हजारो लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा उपक्रम हाती घेतला आहे. रत्नागिरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमी म्हणून ओळखली जाते यात पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन आपण केले याबद्दल आपले अभिनंदन, असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी संवादही साधला.

आता रत्नागिरीत तहसीलदार, तलाठी गावागावात जाऊ लागलेत, त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. सरकारने दिलेल्या सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, हे समाधानकारक आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने धावली पाहिजेत, तरच त्या विकासाची कामे होऊ शकतात, असेही शिंदे म्हणाले.

Powered By Sangraha 9.0