उत्तर प्रदेश : विरोधकांचा संसदेच्या लोकार्पणावर असलेला बहिष्कार हे अत्यंत बेजबाबदार आणि दुःखद असल्याची प्रतिक्रिया उत्तरप्रेदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. त्याचबरोबर देशातील जनता विरोधकांच्या या भुमिकेला कधीच स्वीकारणार नाही, विरोधकांचे हे वर्तन लोकाशाही कमकुवत करण्याचाच एक भाग आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. २८ मे रोजी होणारा संसद भवनाचा उद्घाटन सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भारतीय लोकशाहीसाठी हे नवे संसद भवन गौरवशाली ठरणार आहे. देशातील जनतेसाठी नवे संसद भवन एक अभिमानाची गोष्ट आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात विरोधकांकडून अशाप्रकारे विरोध होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नव्या संसद भवनाच्या लोकार्पणासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रण दिले आहे. त्यावर आता विरोधी पक्षातील काही पक्षांनी याला विरोध केल्याचे पाहायला मिळाले होते. या विरोधकांच्या भूमिकेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.