सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज देणार आहोत. अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा फडणवीसांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सोलापुरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळं सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनच्या कामाला गती देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या दौऱ्यात दिलं. सोलापूरच्या विमानसेवेच्या प्रश्नावरही सोलापूरकरांच्या मनासारखा निर्णय होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.