नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील स्थानकांना महसुली, ऐतिहासिक व पारंपारिक गावाचे नाव द्या

24 May 2023 15:49:04
Mahesh Baldi on ashwini vaishnaw

पनवेल
: नेरुळ - उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूल त्याचबरोबर ऐतिहासिक व पारंपारिक गावांनुसार ओळख कायम राहावी, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नावे देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे आज (दि. २३ मे ) दिल्ली येथे भेट घेऊन केली.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बोकडवीरा ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व सरपंच मनोज पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच रवी वाजेकर, धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदी उपस्थित होते.

मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या, बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी नेरूळ-उरण रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहोचणार आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर, सीएसटीहून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महिनाभरात नेरूळ-उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेकडून मिळाले आहेत.

मात्र या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे आहेत त्यांना गावांची ओळख मिळाली पाहिजे, त्यामुळे महसूल अधिकार क्षेत्रात उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला त्याच गावाचे देणे उचित ठरणार असल्याने त्या ठिकाणी इतर नाव दिल्यास अन्यायकारी होणार आहे. त्यामुळे याचा विचार आणि लोकभावना लक्षात घेता फक्त द्रोणागिरी असा उल्लेख न करता बोकडवीरा द्रोणागिरी, न्हावा शेवा ऐवजी नवघर, रांजणपाडा ऐवजी धुतूम करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नामदार अश्विन वैष्णव यांनी, या बाबतीत लक्ष घालून ग्रामस्थांच्या मागणीला न्याय मिळेल असे आश्वस्थ केले.


Powered By Sangraha 9.0