मुंबई : कोणीही कुणालाही भेटल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत. कोणीही कुणालाही भेटु शकतो. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. उध्दव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर शिंदेंनी हा टोला लगावला आहे. मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, "हुकुमशाही सुरु आहे की नाही ते जनता ठरवेल. देशाची प्रगती लोकांना दिसतेय. जी ७० वर्षात देशाची प्रगती झाली नाही, ती गेल्या ८-९ वर्षात झाली. आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुकीत आतापर्यंतचे जे काही रेकॉर्ड आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तुटतील."
हवामान खात्याचा अंदाज चुकला तर? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषेत उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, "आता शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून राज्य सरकारने विविध नियोजनांसाठी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच, यंदा दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही. असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं."
“बळीराजा, शेतकरी, अन्नदात्याला शुभेच्छा. येणारा खरीप हंगामासाठी यशस्वी व्हावा याकरता मी इश्वराकडे प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक झाली. अतिशय नियोजनपूर्वक कृषी विभाग, सहकार विभागाचं सादरीकरण झालं. खरीप हंगाम शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे. तो यशस्वी होण्याकरता सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खतं, किटकनाशके मुबलक प्रमाणात आहेत.याचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. बोगस बियाणे, बोगस खतं विकून बळीराजाला त्रास देण्याचं काम करेल त्यच्यावर कडक कारवाई. कुठेही त्रुटी, उणीव भासता कामा नये. पाऊस पुढे गेला तर काय करायचं यावर नियोजन करण्यात आलं आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.