अरे,कलेक्टर सायबा पलाट देशील का ?

23 May 2023 19:29:02
thane vanvasi

ठाणे
: नको ते भाषण ... अरे वचन देशील काय ; अरे कलेक्टर सायबा पलाट देशील काय ! असे वनवासी बोलीतील गाणे गात ठाणे जिल्ह्यातील वनवासी बांधवांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयावर धडक मारली. वर्षानुवर्षे वनवासी आपल्या हक्काच्या जमिनी आपल्या नावांवर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र ते बाजूला राहिले उलट वनविभागाच्या वतीने राहती घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा आरोप वनवासी बांधवांनी केला.मागण्या मान्य केल्या नाही तर, तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.

जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी,मुरबाड,ठाणे, कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या वनवासी कुटुंबांच्या राहत्या घरांवर वनविभागाने तोडक कारवाई करून बेघर केले. या सर्वांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वनवासी बांधवांनी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयाबाहेर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला.मोर्चा नंतर शासकिय विश्रामगृहाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी करण्यात आली.

वन हक्क दाव्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. समितीने कोणतेही पुरावे न तपासता १७ हजार १५७ दाव्यांपैकी ९ हजार १११ दावे अमान्य केला आहे. तर, २ हजार ३४८ दावे अद्यापही प्रलंबित असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वन हक्काच्या मागणीसह आरोग्य सेवा, कातकरी कुटुंबियांचे पूनर्वसन या मागण्याही करण्यात आल्या. भिवंडी येथील राहनाळ रेल्वे मार्गिकेमध्ये बाधित होणाऱ्या २८३ कुटुंबियांचे तात्काळ पूनर्वसन करावे अशाही मागण्या करण्यात आल्या.

आधीच कोंडी त्यात मोर्चाची भर

मुंबई- नाशिक महामार्गावर साकेत आणि खारेगाव खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीचा भार वाढून मोठी वाहतूक कोंडी झाली. साकेत पूल ते मानकोली पुलापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. तर श्रमजीवी संघटनेचा मोर्चामुळे या वाहनांचाही भार या मार्गावर वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती.

Powered By Sangraha 9.0