“राजकीय हुतात्मे अनावश्यक गोंधळ करताना मारले गेले किंवा पुलावरून वगैरे खाली घसरून मरण पावले,” अशा आशयाचे देशद्रोही विधान थॅलसेरीच्या आर्डडिओसीचा आर्चबिशप जोसेफ पॅम्प्लानी याने केले. यानिमित्ताने चर्चची स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांप्रतीची असंवेदनशीलता आणि छुपी ब्रिटिश वसाहतवादी मानसिकताच समोर आली आहे.
राजकीय हुतात्मा या अशा व्यक्ती होत्या, ज्या अनावश्यक गोंधळ निर्माण करताना मारल्या गेल्या किंवा पोलिसांकडून पाठलाग सुरू असताना पुलावरून घसरुन ते मरण पावले. पण, येशू ख्रिस्ताचे १२ शिष्य सत्य आणि न्यायासाठी हुतात्मा झाले. मात्र, नव्या युगातील राजकीय हुतात्मा न्यायासाठी हुतात्मा झाले नाहीत,” असे समस्त हुतात्म्यांचा अवमान करणारे देशद्रोही विधान थॅलसेरीच्या आर्डडिओसीसचा आर्चबिशप जोसेफ पॅम्प्लानी याने केले आहे. जोसेफ पॅम्प्लानी याने यापूर्वीही केरळमधील शेतकरी रबराला ३०० रुपये भाव मिळाला, तर ते भाजप सरकारलाही मत देतील, असे विधान करून वादाला तोंड फोडले होते.
आता कन्नूर येथे एका कार्यक्रमात बोलताना जोसेफ याने हुतात्म्यांचा अवमान केला. विशेष म्हणजे, कन्नूरमध्येच हुतात्म्यांची संख्या अधिक असल्याने स्वाभाविकच त्याच्या विधानाचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला आहे. चर्च नेहमीच हुतात्म्यांचा आदर करते, अशी सारवासारव पॅम्प्लानीने नंतर केली. त्याचवेळी “मणिपूर येथे झालेल्या दंगलीत अनेक जण हुतात्मा झाले आहेत. ख्रिश्चन समाजातील अनेक व्यक्ती बलिदान देऊन हुतात्मा झाल्या आहेत. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे त्यांचा मृत्यू झाला,” अशा शब्दांत प्रतिक्रिया देत त्याने नव्या वादंगाला तोंड फोडले. कम्युनिस्ट नेते ई. पी. जयराजन यांनी जोसेफ याने केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना अशा वादग्रस्त टिप्पण्या करायची सवय आहे, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “महात्मा गांधी हे पुलावरून पडून हुतात्मा झाले नाहीत. ते दिल्ली येथील बिर्ला मंदिरात प्रार्थनेसाठी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती, याचा विसर जोसेफ यांना पडलेला दिसतो,” अशा शब्दांत जयराजन यांनी जोसेफ याला प्रत्युत्तर दिले होते.
आर्चबिशपपदी असणार्या जोसेफ याने भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या ज्ञात-अज्ञात लाखो हुतात्म्यांचा अवमान केला. त्याचवेळी मणिपूर दंगलीचे खापर केंद्रातील भाजप सरकारवर फोडून यात बळी पडलेल्यांना हुतात्मा दर्जा देण्याचा हिणकस प्रयत्नही त्याने केला आहे. अशी ही केरळमधील चर्च व्यवस्था तेथील राजकारणावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवते, हे लपून राहिलेले नाही. कोणाला मत द्यायचे, कोणाला नाही, हे तेथील ख्रिस्ती धर्मगुरू ठरवतात. चर्चमधून तशा आशयाचे निरोप सर्वांना दिले जातात. धर्माच्या विरोधात जाऊ नका, असा ख्रिश्चनांना धाक घातला जातो. म्हणूनच केरळमध्ये राहुल गांधी चर्चला प्रामुख्याने भेट देतात. आर्चबिशप हे जबाबदार पद आहे. त्या पदाचाच गैरवापर करून राजकारणात थेट हस्तक्षेप केला जातो. नागरिकांची मते कलुषित करण्याचा प्रकार घडतो.
मुंबई लगत असलेल्या वसई धर्मप्रांताच्या बिशपकडून अशा प्रकारचा हस्तक्षेप कसा होतो, ते तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमात काम करणारे स्वयंसेवक सांगतील. २०१४ मध्ये मुंबईतील सेंट झेवियर्सच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवून गुजरात मॉडेलचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे भाजपला मत देऊ नका, असे सूचवले होते. निवडणूक आयोगाकडे भाजपने त्याची नंतर रीतसर तक्रारही दाखल केली होती.
१९९१ मध्ये एका ‘कम्युनिटी सुपीरिअर’कडे ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी ‘इंटिमेट फेव्हर्स’साठी नन्स पुरवल्या जाव्यात, अशी मागणी केली होती. त्या मागणीला व्हॅटिकनने संमती देताच नन्सचे अधिकृतपणे शोषण सुरू झाले. धर्मोपदेशक बिकट परिस्थिती धर्मप्रसाराचे पवित्र कार्य करीत असताना त्यांनी आपल्या वासना शमविण्यासाठी नन्सचा उपयोग केला, तर त्यात गैर काहीही नाही, अशी भूमिका पोप जॉन पॉल दुसरे व कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर यांनी घेतली होती. पोपपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या बेनेडिक्ट यांनीही याला पाठिंबाच दिला होता. जगभरातून ख्रिस्ती धर्मगुरू आपल्या पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण करत असल्याच्या घटना दरवर्षी उघड होत असतात. व्हॅटिकन सिटी पैशांचा वापर करून या घटना दाबते. यातील पीडितांना भलीमोठी रक्कम दिली जाते. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अगदी भारतातही अशा घटना घडल्या आहेत. तसेच, ख्रिस्ती शाळांमधील मुलींचे शोषणही होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मार्च २००१ पासून व्हॅटिकनने नन्सच्या लैंगिक शोषणाची समस्या अस्तित्वात असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. केरळमधील एक ननने आत्मचरित्र लिहिले. ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए नन’ असे या आत्मकथनाचे नाव असून सिस्टर मेरी असे त्यांचे नाव. वयाच्या १३व्या वर्षांपासून ख्रिश्चन धर्मावर असलेल्या अपार निष्ठेपोटी आपले आयुष्य समाजकार्याला वाहून घेतलेल्या सिस्टर मेरी यांनी काही धक्कादायक बाबी यात नोंदवलेल्या आहेत. केरळमधील चर्च शोषण, आत्महत्या यांसारख्या प्रकरणांमुळे वादाच्या भोवर्यात आहेतच. आपल्याला टोकाच्या मानहानीला सामोरे जावे लागले. तसेच, अतीव दुःखाच्या प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले. परंतु, हा मार्ग स्वीकारताना जिझसच्याप्रती विश्वास ठेवण्याची जी शपथ घेतली होती, तिचे सदैव स्मरण केले, अशा शब्दात सिस्टर मेरी यांनी प्रस्तावना केली आहे.
अत्याचारी बिशप किंवा प्रीस्ट हा पुरुष असल्यानेच व्हॅटिकन त्याच्या मागे ठामपणे उभे राहते आणि अत्याचारित पीडिता ही एक स्त्री असल्याने तिचा आवाज दाबून टाकला जातो, असे या पीडित नन्स सांगतात. गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमधील ‘मिशनरीज ऑफ जिझस’, ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिस्ती पंथांच्या चर्चेसमध्ये नन्स आणि अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ होत असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. दरवर्षी केरळमधील कोणत्या ना कोणत्या भागात लैंगिक शोषण झाल्याचे वृत्त येते. कन्नूर असो वा वायनाड शोषण होत आहे. त्याबद्दल केरळमधील चर्च कधीही बोलताना दिसून येत नाही. धर्मप्रसारासाठी काम करणार्या नन्सकडे भोगदासी म्हणून पाहण्याची व्हॅटिकन सिटीची वृत्तीच या शोषणासाठी जबाबदार आहे. तथापि, जगभरातील सर्वच माध्यमे याविरोधात आवाज उठविण्याची हिंमत दाखवत नाहीत. हिंदू धर्मात अंधश्रद्धा आहेत, यावर बोट ठेवत चर्च भारतात धर्मांतर घडवून आणते. तथापि, ख्रिश्चन धर्मातही अंधश्रद्धा असल्याचे चर्च सांगत नाही. किंबहुना ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा या थेट हिंसेला प्रवृत्त करणार्या आहेत. येशूची भेट आणि स्वर्गाचे आमिष दाखवून सामूहिक अन्नत्याग करायला लावल्याची घटना केनियामध्ये नुकतीच घडली.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना क्रूरपणे ठार करणारे ब्रिटिश हे ख्रिश्चनच होते. जालियनवाला बाग हत्याकांडात ३०० हून अधिक बळी गेले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी अशीच होती. आर्चबिशप जोसेफ याच्या मते, अनावश्यक गोंधळात भारतात लोक हुतात्मा झाले. मग २०१९ मध्ये कॅनबेरीच्या आर्चबिशपने तेथे येऊन माफी का मागितली? या प्रश्नाचे उत्तर जोसेफने द्यावे, असे असतानाही भारताने ख्रिश्नन समाजाला ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराचा दोष दिला नाही. त्याची परतफेड चर्चने रुग्णसेवेच्या नावाखाली धर्मांतराचे काम मोठ्या प्रमाणात केले. आपले हातपाय देशभरात सर्वत्र पसरले. वनवासी बांधवांची फसवणूक केली. गोवा तसेच वसई येथे पोर्तुगीजांनी हिंदूंवर केलेले अत्याचार कोणीही विसरू शकणार नाही.
भारतीय स्वातंंत्र्यलढ्यात ख्रिश्चन असले, तरी ते भारतीय म्हणून लढणारे होतेच की. त्यांचे योगदान भारताने कधीही नाकारलेले नाही. या पार्श्वभूमीवर आर्चबिशप जोसेफ हुतात्म्यांचा अवमान करतो आणि देशातील एकही राजकीय पक्ष त्याच्या विधानाची दखल घेत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही. देशातील स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचा सर्वाधिक सहभाग होता, असा दावा नेहमी केला जातो. त्या काँग्रेसने त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटलाच दाखल करायला हवा होता. मात्र, तो ख्रिश्चन धर्मगुरू असल्याने, त्याला त्याच्या कर्माचे फळ येशू देईल, अशी काँग्रेसची उदात्त भावना असावी. राजीव गांधी यांच्या मारेकर्यांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होतीच की!