मुंबईः केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणा आपलं काम करत असतात. तपास यंत्रणांना काही माहिती मिळाली असेल म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावल आहे. जयंत पाटील यांनी काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याच काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा सासेमीरा लागला, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांचा आरोप मुर्खासारखा आहे. म्हणजे उद्या लादेनला भेटले असा त्याचा अर्थ होता. त्यांच्या विषयी काय बोलणार, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. डबेवाले, टॅक्सीचालक यांच्यासारख्या असंघटीत कामगारांसाठी राज्य सरकार विविध योजना आणत आहे. केंद्र सरकारच्या समन्वयाने या योजना राबवल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.
जयंत पाटील यांना काही झालं तर राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, "कसं आहे केंद्रातील आणि राज्यातील तपास यंत्रणा आपलं काम करत असतात. तपास यंत्रणांना काही गोष्टी आढळल्या असतील म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावल आहे. जयंत पाटील यांनी काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याच काहीच कारण नाही." असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.