नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU नेते नितीश कुमार यांनी दि. २१ मे रोजी राजधानी दिल्लीतील विरोधी शक्तींना केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात एकत्र करण्याच्या प्रयत्नात अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या पोस्टींग व ट्रान्सफरबाबत काढलेला अध्यादेश हा संविधानाच्या विरोधात आहे, असे ही नितिश कुमार यांनी म्हटले आहे. २०२४ मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपचा अंत होईल,असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. एका महिन्यात नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा केजरीवालांची भेट घेतली.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कर्नाटकातील काँग्रेसचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री बेंगळुरू येथे उपस्थित राहिल्यानंतर ही बैठक झाली. नितीश कुमार म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य होता, मात्र असे असतानाही केंद्र सरकार जे काही करू पाहत आहे ते विचित्र आहे. सर्वांनी संघटित व्हायला हवे. आम्ही पूर्णपणे केजरीवाल यांच्यासोबत आहोत, असे ही नितीश कुमार म्हणाले.