मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने दि. १९ मे रोजी २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ३० सप्टेंबरपर्यंत २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिल्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले. नोटा बदली करताना काय करावे लागेल याबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. त्यातच आता एसबीआयने एक परिपत्रक जारी करून नोट बदलीकरता कोणत्याही कागदपत्राची गरज नसल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांना बँकेत येऊन कागदपत्राविना २ हजाराच्या नोटा जमा करणे शक्य होणार आहे. स्टेट बँकेने यासंदर्भात आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.