मुंबई : महाविकास आघाडीत आतापासूनच लोकसभेच्या जागावाटपावरून वाद सुरु झाले आहेत. याउलट दुसरीकडे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप कुठल्याही परिस्थितीत जिंकणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तसेच राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे विकासात्मक बाबींविषयी बोलायला काहीही नाही. त्यामुळे आताची शिवसेना केवळ ‘मातोश्री’साठी असून त्यात कार्यकर्त्यांना कुठलेही स्थान राहिलेले नाही. येत्या काळात पदांसाठी ठाकरे गटात वाद होणार आणि त्यातून मोठी बंडखोरी होणार हे निश्चित आहे, असं ही राणे म्हणाले.
दरम्यान शिवसेनेच्या राजवटीत मुंबईतून मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईची गेल्या 25 वर्षांत त्यांनी किती दुरावस्था ठाकरेंनी केली आहे, अशी टीका ही नारायण राणेंनी केली. तसेच सरकारच्या स्थिरतेविषयी टीकाटिप्पणी करणारी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मुळात सरकार आणि फडणवीस, शिंदेंवर आरोप करणार्यांचे आपल्या मतदारसंघात आणि एकूण महाराष्ट्रात काम किती आहे, याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, असे ही राणे म्हणाले.