गणपतीचा तिकीट गावलाच नाय! कोकण रेल्वेचं आरक्षण दीड मिनिटांतच फुल्ल

    20-May-2023
Total Views |
 
Kokan Railway
 
 
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जायचेच असा निर्धार करून हजारो चाकरमानी 3 महिनेआधीच जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.यंदाही तेच घडले, मात्र अवघ्या एका मिनिटात सर्व गाडय़ांची तिकिटे संपल्याने चाकरमान्यांना निराश व्हावे लागले. हे नैराश्य आता संतापापर्यंत पोहचले आहे. एका मिनिटात एका गाडीची दोन हजार तिकिटे आरक्षित होतातच कशी? असा सवाल करून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
 
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गावी जाणाऱया चाकरमान्यांनी आतापासूनच या सणाची आखणी करायला सुरुवात केली आहे. त्यात सर्वात आधी रेल्वेचे तिकीट पदरात पाडून घ्यायचे होते. 120 दिवस आधी हे आरक्षण सुरू होते. यंदा 16 मेपासून आरक्षण सुरू झाले. गेले चार दिवस चाकरमानी रेल्वेच्या आरक्षण खिडक्या गाठत आहेत. अनेकजण रात्रीपासूनच तिकीट खिडकीवर नंबर लावत आहेत. मात्र सकाळी 8 वाजता आरक्षण खिडकी उघडल्यावर पहिल्याच मिनिटाला आरक्षण फुल्ल होत असल्याने व बहुतेकांना वेटिंग तिकीट घेऊनच परतावे लागत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.