मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पाहायला मिळत आहे. आर्यन खान प्रकरणासंबंधी त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्याच बरोबर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात संभाषण झाल्याची माहिती उघड झाली आहे. शाहरूख खानने मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचेही समीर वानखेडेंनी याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे आधीचे चार्जशीट बदलली गेल्याचा आरोप वानखेडेंनी याचिकेतून केला आहे. याआधी जे काही आरोप केले आहेत त्यात म्हटले आहे की आर्यन खानने जे मेसेज शाहरूख खानला पाठवले तेच मेसेज समीर वानखेडेंनी पाठवले याचा खुलासा त्यांनी याचिकेद्वारे म्हटले आहे.
समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषण
शाहरुख खान : समीर साहेब मी तुमच्याशी बोलू शकतो का?
एक वडील म्हणून मला तुमच्याशी बोलायचे आहे. प्लीज मी बोलू शकतो का?
तुम्ही माझ्याबद्दलचे काढलेले उद्गार याबद्दल मी आपले आभार मानतो. मी आणि तुम्ही नक्कीच एक जबाबदारी पार पाडली आहे. हे प्रकरण आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल. मी त्याला एक माणूस म्हणून घडविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तरुणांना बदल घडवून आणण्याकरिता आपण प्रयत्न करत आहात, तुम्हाला खूप शुभेच्छा मला सहकार्य केल्याबद्दल अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देवो.
समीर वानखेडे : माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
शाहरुख खान : आपण एक छान व्यक्ती आहात. माझ्या मुलावर दया दाखवा. त्याची काळजी घ्या. तुम्हाला वेळ असेल तेव्हा मला सांगा. आपण भेटूयात. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. त्याला तुरूंगात राहू देऊ नका प्लीज, त्याचे आयुष्य उध्वस्त होईल. त्याचा अंतरात्मा वेगळा विचार करेल. प्लीज त्याला लवकरात लवकर तुरुंगातून सोडा. तुम्हालाही माहित आहे त्याच्या सोबत जरा जास्तच घडलयं. बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागत आहे.
दरम्यान, त्यातच आता समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर हिचे नाव समोर आले आहे. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी या प्रकरणी चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंचा पाय अधिक खोलात जाताना दिसत आहे.