२५ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रत्नागिरी दौरा

18 May 2023 19:42:38
eknath shinde

मुंबई
: ‘शासन आपल्या दारी’ या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यात हजारो दाखल्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून आयोजित करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारे हे दाखले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाटण्यात येणार असून हा कार्यक्रम गुरुवार, दि. २५ मे रोजी रत्नागिरीतपार पडणार आहे.

नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ ही नवी योजना राज्य शासनाने सुरू केली असून, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातही हजारो दाखले दिले जाणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले आहेत. रत्नागिरीत येत्या २५ मे रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.

‘शासन आपल्या दारी’ ही नवी योजना १३ मेपासून राज्यात सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात या योजनेचा आरंभ झाला. या योजनेतून विविध योजनांचे प्रलंबित दाखले तातडीने दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ विविध योजनांमधून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७५ हजार दाखल्यांचे वाटप होणार आहे.

राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांचा कार्यक्रम हा रत्नागिरीमध्येच होणार आहे. पालकमंत्री सामंत यांनी या योजनेचा कार्यक्रम रत्नागिरीत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार प्रशासनानेही याची तयारी सुरू केली असून, विविध विभागांच्या बैठका आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाल्या आहेत.



Powered By Sangraha 9.0