मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक खेळाडूंचे माहेर घर असणाऱ्या शिवाजी पार्कवर धुळीचे साम्राज्य असल्याचा प्रत्यय येत होता. मात्र धुळीचे हे साम्राज्य काही केल्या कमी होत नसल्याने येथील स्थानिक हैराण झाले आहेत. शिवाजी पार्कवर उडणाऱ्या धुळीसंदर्भात येथील स्थानिकांनी मुंबई महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र अध्याप मुंबई महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचे मत येथील स्थानिकांनी मांडले आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजे अनेक खेळाडूंचे माहेर घरच. मात्र मागील काही काळापासून येथे वास्तव्यास असणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिकांना श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याच्या तक्रारी येथील डॉक्टरांकडे आल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही पालिका गांभीर्याने लक्ष पुरवीत नसल्याने येथील स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही अनेकदा येथील धुळीबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. पालिका उपाययोजना देखील करत आहे. मात्र ठोस अशी पावले अध्याप पालिका उचलत नाहीये. येथे उडणाऱ्या धुळीमुळे आम्ही अक्षरशः हैराण झालो असून अनेकांना श्वसनाचे आजार जडल्याचे, येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.