नातेसंबंधाची उसवती वीण

14 May 2023 21:26:25
murder

पैसा सर्व सुख, आनंदाचे कारण कधीच नव्हता आणि पुढेही असणार नाही. मात्र, मनुष्याच्या विवेकी बुद्धीत हैवान शिरला, तर काय विद्ध्वंस होतो याचा प्रत्यय गेल्या आठवड्यातील राज्यात घडलेल्या अन् अंगाचा थरकाप उडवणार्‍या घटनाची मालिकांमधून समोर आला. ठाणे जिल्ह्यात आई-वडिलांचा राग मनात ठेवून मुलाने वृद्ध मात्यापित्यांवर सुरीने हल्ला चढवला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे या लोणार सरोवरानजीक गावात पतीने पत्नीचा राग आल्याने लोखंडी पहारीने मारहाण करत खून केला आणि नंतर पोलीस चौकशी, शिक्षेची भिती यामुळे खुनी पतीनेही शेतात गळफास घेत आत्महत्या केली. विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृतांच्या पुण्यातही वडिलांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन मुलाने पित्याचा गळा दाबून खून केला. या सार्‍या घटनांचा अन्वय लावता रागावरील नियंत्रण हरवल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत या मनोरुग्ण व्यक्तीकडून या हत्या अन् आत्महत्या झाल्याचे दिसून येते. रक्ताचे नातेसंबंध एकमेकांच्या जीवावर का उठत आहे.? जे निर्माण करता येत नाही ते संपवण्याचा अधिकार यांना कुणी दिला. पती, पत्नी, मुलगा, आई-वडील यांच्याशी जमत नसेल, तर वेगळे होऊन अथवा कायद्याचे इतरही मार्ग सर्वांना चोखळता आले असेतच ना? रक्ताच्या नात्यांना संपवून टाकत सर्व प्रश्न कायमचे संपणार की आणखीच वाढणार याचा तरी विचार यांनी करायला हवा होता. या घटना मन सुन्न करणार्‍या अन् रागावर नियंत्रण मिळवण्यास आलेले अपयश, भावनांचे व्यवस्थापन न जमल्याने झालेल्या टोकातून घडल्या. विवेक, क्षणिक रागावर नियंत्रण नसणे हे मूल्य, संस्कार, आध्यात्मिक दृष्टिकोन हरवल्याचे द्योतकच! मानवी मनाचे हे भयावह, मन विषण्ण करणारे रुप केवळ घटना नव्हे, तर मनोविकृती किंवा मानसिक आजारच.! त्यावर वेळीच उपचार झाले असते, तर हेही टाळता आले असतेे. जेव्हा व्यक्ती स्वत:च्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास अक्षम ठरतो. तेव्हा, समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतलाच पाहिजे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि मूल्यांना पर्याय नाहीच!

प्लास्टिकचा ‘भस्मासूर’

सिंगल यूज’ प्लास्टिक पिवशव्यांचा वापर करू नका, अशी जागृती वारंवार नाशिक महापालिका अन् पर्यावरणावर काम करणार्‍या संस्था करत आहेत. तरीही गेल्या चार महिन्यांत म्हणजे जानेवारी ते एप्रिल दरम्यान ८१ केसेसमधून तब्बल ३२२ किलो प्लास्टिक जप्त करण्याची कारवाई नाशिक महापालिकेने केली. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत शहरातील स्वच्छता मोहिमांमधून सातत्याने प्लास्टिक कचरा न वापरण्याची सूचना महापालिकेकडून सुरूच आहे. पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थ देण्यासाठी वापरले जाणारे पातळ प्लास्टिक (खर्रा), पन्ना वापरू नये. तसेच, फळ-भाजीविक्रेते, मांस विक्रेते यांनीही ‘सिंगल यूज’ प्लास्टिक वापरू नये, असे आवाहन मनपाने वारंवार केले. त्यासाठी दंडाची तरतूदही आहे. पहिल्यांदा प्लास्टिक बाळगणार्‍यांना अथवा विकणार्‍यांना पाच हजार, दुसर्‍यांदा हा गुन्हा करणार्‍यांना दहा हजार तर तिसर्‍यांदा असे प्लास्टिक विकणार्‍या अथवा बाळगणार्‍यांना २५ हजाराच्या दंडाची तरतूद आहे. नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे सांगतात,“आम्ही दररोज नाशिकमध्ये मनपाच्या सहाही विभागात प्लास्टिक विरोधात कारवाई करत आहोत. त्यातून तब्बल ३० हजारांचा दंडही वसूल केला. परंतु, आता नागरिकांनीच सुजाण होण्याची गरज आहे. ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर करणारच नाही, असा ठाम संकल्प सर्वांनीच केला नाशिक प्लास्टिकमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.” मध्यंतरी पर्यावरणावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी शहरात बाजारपेठेत कापडी पिशव्या मोफत वाटल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांकडून एक रुपयाला एक याप्रमाणे जुन्या साड्या, कपड्यांच्या पिशव्या शिवून त्या फळ-भाजीविक्रेत्यांकडे ठेवल्यास त्याचाही उत्तम परिणाम दिसून येईल, असा प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथील ‘प्रयास यूथ फाऊंडेशन’ने केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. ‘मी सिंगल यूज प्लास्टिक’ वापरणार नाही आणि बाहेर जाताना घरातूनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडेल,’ असा संकल्प नाशिककर स्त्री-पुरुषांनी केल्यास नाशिक स्वच्छ, सुंदर, हरित होण्यासह प्लास्टिकमुक्त होईल यात शंकाच नाही.

निल कुलकर्णी 

Powered By Sangraha 9.0