ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.मात्र, कारवाई करण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने ठाणे पोलिसांनी फतवा काढुन अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली आहे. कळवा विभागाचे सहा.पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी, मुंब्य्रात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्कार समारंभाला जाण्यास जाधव यांना प्रतिबंध करण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, पोलिसांच्या या फतव्यामुळे मनसैनिकामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
गुढी पाडव्याच्या मुंबईतील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगली आणि मुंबईतील अनधिकृत मजारचे वास्तव समोर आणले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर राज्यभर मनसैनिकांनी आपापल्या विभागातील अनधिकृत दर्गे, मशिदीविरोधात आवाज उठवला होता. ठाणे शहर मनसेनेही मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्याचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासन तसेच वनविभागाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता.
यामुळे मुंब्रा परिसरातील वातावरण ढवळुन निघाले होते, मुंब्र्यातील काही मुस्लिमांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता, तर काही मुस्लीम कट्टरपंथीयांकडुन अविनाश जाधव यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.तसेच, पोलिसांनी जाधव यांना ९ एप्रिलपर्यत मुंब्य्रात प्रवेशबंदी केली होती. या पार्श्वभूमीवर, मुस्लिम बांधवांचा रमझान महिना सुरु असल्याने पोलीस व वनविभागाच्या विनंतीवरून मनसेने तुर्तास शांत बसण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान,अविनाश जाधव यांची मनसे नेतेपदी निवड झाल्या निमित्त ११ एप्रिल रोजी मुंब्य्रातील मुस्लिम समाजाकडुन जाधव यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. मात्र,२२ एप्रिल रोजी रमजान ईद असल्याने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे अविनाश जाधव काय पवित्रा घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.