आगामी काळात समग्र विश्वात मानवतेची उभारणी, विश्वशांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि मूल्यांची स्थापना करावयाची झाल्यास तशा प्रकारची आदर्श संतती जन्माला घालावी लागेल. यासाठी नवतरुण पती-पत्नी (माता-पित्यांनी) गर्भस्थापनेपासूनच याची सुरुवात करावी.}
@प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
या संस्काराच्या माध्यमाने ज्यांना मातृ-पितृपद लाभणार आहे, असे यजमान पती-पत्नी केंद्रस्थानी आहेत. म्हणून या दोघांची या संस्कारात महत्त्वाची भूमिका. मातेचे रजतत्व व पित्याचे वीर्यतत्व यांच्या संमिश्रणातून संततीची प्राप्ती होते. आईच्या गर्भात सूक्ष्मातिसूक्ष्म जीवाचा प्रवेश होतो, यालाच ‘गर्भात आधान’ म्हणजे स्थापना असेही म्हणतात. गर्भाधानाचा कालावधी कोणता, या संदर्भात आपल्या शास्त्रात स्पष्ट संकेत दिले आहेत. सामान्यतः प्रत्येक स्त्रीसाठी रजोदर्शनाचा काळ हा प्रत्येक महिन्याला चार दिवसांचा असतो. या चार रात्री सोडून पुढील 12 रात्री स्त्री-पुरुष समागमाद्वारे ऋतुदानासाठी निश्चित केल्या आहेत. यातदेखील पर्व किंवा पौर्णिमाा, अमावस्या आली तर त्यांनाही त्यागावे, असे मनुस्मृतीत (3/47, 48, 49) संकेत दिले आहेत, असे असले तरी केवळ यालाच प्रमाणभूत मानता येत नाही. कारण, पती-पत्नीचा योग्य प्रकारे समागम, त्यांचे शारीरिक आरोग्य, योग्य असे खानपान आणि मानसिक अवस्था याबाबी देखील अतिशय महत्त्वाच्या ठरतात त्याचबरोबर पुरुष जर अधिक वीर्यवान असेल, तर त्याद्वारे पुत्र आणि स्त्रीचे आर्तव म्हणजेच रजस्तत्त्व अधिक असेल, तर कन्या किंवा हे दोन्ही तत्व समान असतील, तर नपुंसक संतती जन्माला येण्याची शक्यता असतेे.
या गर्भाधानप्रसंगी पती-पत्नीच्या शरीर व मनाच्या अवस्थेचा येणार्याद बाळावर खूपच प्रभाव पडतो. बाळावर सुसंस्कार स्थापण्याचा सर्वात प्रथम व सर्वात प्रभावशाली असा प्रसंग जर कोणता असेल, तर तो म्हणजे गर्भामध्ये वीर्यस्थापनेचा! गर्भाशयात वीर्य प्रदान करणे तितकेच पवित्र कार्य आहे. जितके की, यज्ञांमध्ये अग्नीची स्थापना करणे! या गर्भाधानप्रसंगी धाता आणि आधारयित्री म्हणजेच पती आणि पत्नी यांचे चिंतन, मनन, सिंचन हे अत्यंत महत्त्वाचे असते. पती-पत्नीचे मन-मस्तिष्क आणि त्यांचे संकल्प हे अत्यंत चांगले असावेत. याप्रसंगी पती-पत्नी या दोघांनी आपल्या भावी संततीसाठी मनात खूपच उदात्त सुविचार ठेवावेत. आपली होणारी संतती सद्गुणांनी, सद्विचारांनी, सच्चारित्र्याने, रूपाने, सुंदरतेने, लावण्याने परिपूर्ण व अंग-प्रत्यंगाने अतिशय सुदृढ, बलशाली व मनाने खंबीर, बुद्धीने तेजस्वी व विचारांनी अतिशय प्रगल्भ व उत्कृष्ट असावी. त्यावेळच्या रतिप्रसंगालाच ‘गर्भस्थिती’ असेही म्हणतात. याच क्षणाला ‘कल्पक्षण’ असे म्हणतात. मंत्रात म्हटले आहे,
विष्णू योनिं कल्पयतु
त्वष्टा रुपाणि पिंशतु!
विश्वातील प्रत्येक कणाकणात भर उरलेला तो विष्णू भगवान या स्त्रीच्या गर्भस्थानाला सुसंकल्पित बनवो. जगाची निर्मिती करणारा तो कुशल अभियंतारूप परमेश्वर म्हणजेच त्वष्टा हा विविध प्रकारच्या रूपांना धारण करो.
अर्थातच पती-पत्नीचे संकल्प सुयोग्य असावेत. या सुसंकल्पांचाच अनुकूल परिणाम त्या जीवात्म्यांच्या प्रवेशप्रसंगी होत असतो. या कल्पक्षणी जर या दोघा दाम्पत्त्यांचे संकल्प शुभ असतील, तर भावी पुत्र किंवा कन्या हे शुद्ध, सदाचारी, पवित्र आणि सद्गुणसंपन्न निपजतील. याउलट सर्व काही विपरित होईल.
ही गोष्ट विचारात घेऊनच आचार्य चरक ऋषी म्हणतात- जी स्त्री आपल्या बाळाला शुद्ध, चारित्र्यसंपन्न, प्रतिभावान, पराक्रमी बनवू इच्छिते, तिने सकाळी व संध्याकाळी बलशाली व उत्तम प्रजातीच्या पांढर्याद शुभ्र बैलाचे दर्शन करावे. जेणेकरून होणारे बाळदेखील अतिशय सुंदर, शारीरिकदृष्ट्या बलवान व बौद्धिकदृष्ट्या प्रतिभा संपन्न निपजेल. गर्भधारणाच्या वेळी पती-पत्नींच्या मनामध्ये जे विचार प्रबळ असतील, त्याचा परिणाम संततीच्या आचार-विचारांवर पडतो. याबाबतीत विशेषकरून मातेने अधिक सतर्क राहावयास हवे. कारण, आईच्या मनोवृत्तीचा संततीच्या निर्मितीवर फारच प्रभाव असतो. गर्भस्थापनेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंतच्या कालावधीत आईने विशेष दक्ष राहावे. नेहमी सद्ग्रंथांचे वाचन, पवित्र विचार, शुद्ध चिंतन व मनन केल्यामुळे उदरस्थ बाळाच्या मानसिकतेवर खूपच अनुकूल प्रभाव पडतो. महाभारतातील अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे कौशल्य आईच्या गर्भात असताना शिकतो. महाराणी मदालसा गर्भावस्थेत असताना बाळासाठी गाणे गात होती-
शुद्धोऽसि बुद्धोऽसि निरंजनोऽसि संसारमायापरिवर्जितोऽसि!
या गीताचा असा परिणाम झाला की, तिची प्रारंभिक तीनही मुले योगी व ऋषीवृत्तीची बनली. हे पाहून राजाला चिंता वाटू लागली की, आता राज्य कोण सांभाळेल? तेव्हा मदालसेने आपल्या गाण्याचेे शब्दच बदलले आणि ती म्हणू लागली-
धन्योऽसि रे यो वसुधामशत्रुरेकश्चिरं पालयिताऽसि पुत्र!
या गीतामुळे धैर्य धुरंधर असा क्षत्रीय वीरपुत्र जन्माला आला, जो की त्या राज्याचा भावी प्रजाहितदक्ष व शौर्यशाली असा राजा बनला.
अशा कितीतरी घटना आपणांस पाहावयास व वाचावयास मिळतात की मातेच्या मानसिक व बौद्धिक तपाने अनेक बुद्धिमान, ज्ञानी व कर्तृत्ववान मुले-मुली जन्माला आली आहेत. यासाठी उचित आहे की, गर्भधारणा झाल्यानंतर पुढे मातेने खूप काळजी घ्यावयास हवी. मनात नेहमी उत्साह ठेवावा. कधीही चिंता, नैराश्य, दुःख आणि निरुत्साह आणता कामा नये. महापुरुषांची चित्रे व ज्ञानप्रद चित्रपट पाहावेत, थोर महात्म्यांचे, समाज सुधारकांचे, शूर-वीरांचे आणि संतांचे चरित्रग्रंथ वाचावेत. सकाळी व संध्याकाळी परमेश्वराचे ध्यान करावे आणि ईश्वराकडे उत्तम संततीसाठी प्रार्थना करावी. समाज, देश व राष्ट्राच्या उत्थानाचा विचार करावा. मनात परोपकाराची व विश्वकल्याणाची पवित्र भावना ठेवावी. सात्विक व शुद्ध आहार घ्यावा. मांसाहार, तिखट, तेलकट पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. हे सर्व करण्यासाठी पती व घरातील सदस्यांनी वातावरण निर्मिती करावी, असे झाले तर ‘माता निर्माता भवति’ हे वचन सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही.
आगामी काळात समग्र विश्वात मानवतेची उभारणी, विश्वशांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि मूल्यांची स्थापना करावयाची झाल्यास तशा प्रकारची आदर्श संतती जन्माला घालावी लागेल. यासाठी नवतरुण पती-पत्नी (माता-पित्यांनी) गर्भस्थापनेपासूनच याची सुरुवात करावी. जर ही काळजी घेतली, तरच आदर्श मानव समाज उदयास येईल, अन्यथा ‘मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति’ याप्रमाणे माणसाच्या रूपातील भरमसाठ पशुंच्या झुंडी जन्माला येऊन काय उपयोग? अशा मानवरुपी जनावरांमुळे तर सार्या जगात राक्षसी प्रवृत्ती बळावत आहे.
(क्रमश:)
9420330178