विलक्षण दुनिया वटवाघळांची...

16 Apr 2023 20:59:07


indian flying fox
निसर्गचक्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावूनही, वटवाघळं ही कायम दुर्लक्षितच राहिली आहेत. ही ना वाघासारखी दिमाखदार, ना पक्ष्यांसारखी सुंदर अन् सुरेल, विचित्र दिसण्यामुळे आणि रात्रीच्या वेळी कार्यरत असल्याने या सस्तन प्राण्यांबद्दल समाजामध्ये गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. वटवाघूळ हा गरम रक्ताचा आणि उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. जगभरात त्यांच्या 1400 पेक्षा जास्त प्रजाती असून, सर्वात जास्त विविधता असणार्‍या सस्तन प्राण्यांच्या गटात त्यांचा दुसरा क्रमांक आहे. पृथ्वीतलावरील सहा खंडांवर त्यांचं अस्तित्व नोंदवलं गेलं आहे.
बर्‍याच जणांनी फक्त झाडावर लटकलेली किंवा संध्याकाळी चुकून घरात आलेली वाघळेच पाहिलेली असतात, पण जुन्या पडक्या, वापरात नसलेली घरं, देवळं, बोगदे, झाडांमधील ढोली, गुहांमधून वेगवेगळ्या प्रजातींची वाघळे राहताना दिसतात. ‘इंडियन फ्लायिंग फॉक्स’, ‘हॉर्स शू नोज्ड बॅट’, ‘लीफ नोज्ड बॅट’, ‘टोम्ब बॅट’, ’फॉल्स व्हॅम्पायर बॅट’, ‘पेंटेड बॅट’ या आपल्या प्रदेशात आढळणार्‍या काही वटवाघळांच्या प्रजाती आहेत. त्यांच्या आहारानुसार शाकाहारी (फळे - मध), मांसाहारी (कीटकभक्षी - बेडूक - उंदीर - मासे) असे मुख्य प्रकार पडतात. जळवांसारखी रक्त शोषणारी ‘व्हॅम्पायर’ जातीची वाघळे भारतात सापडत नाहीत.

फलाहारी वाघळांकडून केळी, आंबा, पेरू, फणस, काजू, कोको, मका, नीम, उंबर, खजूर, कापूस अशा नगदी पिकांचं परागीभवन - बीजप्रसारण केलं जातं. त्याचबरोबर आपल्या जंगलातील 200 हून अधिक वृक्षांच्या बिया मैलोन्मैल पसरवून, त्यांच्या बीजरोपणात आणि नवीन जंगल रुजवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक कीटकभक्षी वाघळांकडून दररोज दोन हजार-पाच हजार कीटकांचा (डास आणि इतर सदृश्य कीटक) फडशा पाडला जातो. आपल्या पिकांवरही आणि फळबागायतींमधील कीटकांना संपवून आपलं उत्पन्न वाचवण्याचे कामही याच वटवाघळांद्वारे केले जाते. जंगलतोड झालेल्या प्रदेशात नवीन जंगल रुजवताना 90 टक्क्यांपेक्षा जास्त आद्य वनस्पतींचे बीजारोपण होण्यामागे वटवाघळांचा हात असतो.
वटवाघळे अन्न शोधण्यासाठी आणि उडताना मार्गक्रमण करण्यासाठी मानवी कानाला ऐकू न येणार्‍या अल्ट्रासॉनिक (प्रचंड कंपनसंख्या) असलेल्या ध्वनिलहरींचा वापर करतात. प्रत्येक प्रजाती ही वेगवेगळ्या क्षमतेच्या ध्वनिलहरींचा वापर करते. फलाहारी/शाकाहारी वाघळे मात्र मार्ग आणि अन्न शोधण्यासाठी डोळे व नाक या इंद्रियांवरच अवलंबून असतात. वाघळांच्या विष्ठेमध्ये नायट्रोजेनचे प्रमाण खूप असल्याने, शेतीमध्ये खत म्हणून पूर्वी त्याचा वापर व्हायचा. कंबोडिया देशातील काही शेतकरी आपल्या शेतात वाघळांना राहण्यासाठी वेगळी झोपडीच बांधून ठेवतात, जेणेकरून जमिनीवर पडलेली त्यांची विष्ठा शेतात वापरता येईल.


painted bat

तीन वर्षांपूर्वी करोना संक्रमण जगभर सुरु झाल्यावर विषाणूच्या उत्पत्ती बाबत ठोस निष्कर्ष काढण्यापूर्वीच प्रसार माध्यमांमधील अनेक घटकांनी वटवाघळांना ’कोविड-19’ पसरविण्याबाबत दोषी ठरवून मोकळे झाले. या अपप्रचारामुळे उडू शकणार्‍या या सस्तन प्राण्यांना मारण्यासाठी किंवा आसपासच्या परिसरातून काढून टाकण्याची मागणी आणि प्रयत्न अनेकांकडून केले गेले. ‘कोविड-19’ हा वटवाघळांमुळे अजिबात पसरत नाही. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, भारतातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘बॅट कोरोना व्हायरस’ आढळला आहे. परंतु, घाबरण्याचे कारण नाही. कारण, ‘बॅट कोरोना व्हायरस’ हा डठड-उेत-2 पेक्षा वेगळा असून त्यामुळे ‘कोविड-19’ होऊ शकत नाही. वटवाघळांच्या विष्ठेमुळे मनुष्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोकादेखील नाही. जर वटवाघळे रोगप्रसारक नाहीत, तर नक्की कशामुळे ही महामारी उद्भवली हे कोड राहतंच.

विषाणू अभ्यासक डॉ. अरिंजय बॅनर्जी (‘कोविड-19’ विषाणू विलग करणार्‍या टीमचे सदस्य) म्हणतात की, मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप आणि वन्यजीवांच्या अधिवासावरील अतिक्रमण, यामुळे नवीन विषाणू मानवाच्या संपर्कात येण्याचा खूप धोका असतो. हे विषाणू केवळ वटवाघळेच नाही, तर कोणत्याही वन्यजीव प्रजातींमधून येऊ शकतात. अशा प्रकारे, नवीन रोगजनकांचा उदय रोखण्यासाठी आपल्याला मानवी जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. सद्य:परिस्थितीत आणि अलीकडच्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यामागे मानव-वन्यजीव यातील संघर्ष, बदलणारं नातं, जागतिक वन्यजीव व्यापार आणि औद्योगिक पशुधन शेती या सर्वांकडेच संशयी नजरेने पाहिले जाते.

वटवाघळं ही 200 पेक्षा जास्त संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंची वाहक असल्याकारणाने त्यांच्यामुळेच रोगप्रसार होतो, असा गैरसमज आहे. यामुळे सर्वसाधारणपणे सर्वच वटवाघळांबद्दल नकारात्मक वातावरण तयार होऊन त्यांच्या संवर्धन प्रक्रियेत बाधा येते. वटवाघळांद्वारे थेट कोणत्याच संसर्गजन्य रोगांचा प्रसार होत नाही. त्यामुळे अधिवास नष्ट करणे, त्यांना हुसकावून लावणे, असे उपाय अंमलात आणल्यास त्यांच्याकडून रोगप्रसार होण्याचे संभाव्य धोके वाढतात.



bats
 

शिकार, रासायनिक कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर, बेसुमार जंगलतोड, गुहांसारख्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप, वाघळांच्या वसतिस्थानांचा नाश इ. पासून आपल्या भागांतील वटवाघळांना मोठे धोके आहेत. वाघळांमुळेच किनार्‍यालगत ढाल उभारणार्‍या खारफुटीच्या वनस्पतींचं परागीभवन होतं. कीटकभक्षी वाघळांनी पिकांवरील कीड आणि डास खाल्ल्यानेच आपल्या देशाची अन्नसुरक्षा आणि आरोग्य अबाधित राहतं. दुर्दैवाने वटवाघळांच्या या कामगिरीला म्हणावे तितकी मान्यता कायदेशीररित्या दिली जात नाही. वटवाघळं ही अनेक संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंचे वाहक असल्याकारणाने, त्यांच्यामुळेच रोगप्रसार होतो, असा गैरसमज आहे. यामुळे सर्वसाधारणपणे सर्वच वटवाघळांबद्दल नकारात्मक वातावरण तयार होऊन त्यांच्या संवर्धन प्रक्रियेत बाधा येते.
वटवाघूळ हे भारतातील जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. परागीभवन, बीजप्रसार आणि कीटक नियंत्रक म्हणून ते निसर्गात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतात. विविध परिसंस्थांमधील त्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान याबद्दल फारशी माहिती आणि अभ्यास नसल्यामुळे, वाटवाघळांच्या संरक्षणासाठी सहसा प्रयत्न केले जात नाहीत. ज्यामुळे वाघळांच्या बहुतेक प्रजातींना वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षण मिळालेले नाही. निरोगी सहजीवनासाठी साथीच्या आजारांच्या विषयाबरोबरच आजूबाजूच्या वटवाघळांबद्दल अधिक जागरूकतेची समाजाला आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांच्या संवर्धनासाठी जागरूकतेने प्रयत्न केले जातील.
- राहुल खानोलकर






Powered By Sangraha 9.0