मुंबई : राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्गात वाढत्या तापामानाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आले आहेत. दुपारी प्रचंड ऊन आणि रात्री वातावरणात निर्माण होणारा गारवा, यामुळे आंब्याचा मोहर गळून पडण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे.
तर यावर उपाय म्हणून सकाळ-संध्याकाळ झाडांना मुबलक पाणी देण्याची गरज असल्याचं हवामान कृषी शास्त्रज्ञांनी सांगितलंय. यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. मात्र ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लाल कोळी, भुरी रोग, मोहोर काळा पडणे, यातून चिकटी व मधुरा पडण्याच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसची जात जगप्रसिद्ध आहे.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सकाळी पुढील ३-४ तासांत मुंबई, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांत वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासोबतच हवामान खात्याने लोकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्यास सांगितले होते. IMD ने काही वेळा 50-60 किमी प्रतितास वेगाने हलका पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता असलेल्या अंशतः ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.