मुंबई : ''महाराष्ट्रात खोके कुणी जमविले ते मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी अडीच वर्षात काय दिवे लावले आधी त्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी. महाराष्ट्राचे खोके मास्टर हे उद्धव ठाकरेच आहेत,'' अशी टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
बुधवार, दि. ८ मार्च रोजी नारायण राणे यांनी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी आपण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने चांगला अर्थसंकल्प मांडावा अशा शुभेच्छा देखील आपण फडणवीस शिंदेंना दिल्याचे म्हटले आहे.
खेडची सभा पूर्णपणे मॅनेज !
मागील आठवड्यात माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात खेडमध्ये जाऊन सभा घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राणेंनी ही सभाच मॅनेज असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंची सभा पुर्णपणे मॅनेज होती. या सभेसाठी खेड वगळता इतर भरपूर ठिकाणावरून लोक सभेसाठी आणण्यात आली होती. उद्धव ठाकरेंना जनतेशी, महाराष्ट्राविषयी आणि विकासावर बोलता येत नाही. आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अडीच तास मंत्रालयात जाणाऱ्यावर आपण काय बोलणार ? '' असे राणेंनी म्हटले आहे.