नवी दिल्ली : त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर माणिक साहा यांनी सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आदी उपस्थित होते.
माणिक साहा यांच्या शपथविधी समारंभात रतनलाल नाथ, प्रणजित सिंघा रॉय, प्रणजित सिंघा रॉय आणि सुशांत चौधरी यांनी आगरतळा येथे त्रिपुराचे मंत्री म्हणून शपथ घेतली. रतनलाल नाथ हे मोहनपूरचे आमदार असून ते बिप्लव देव यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. यासोबतच पंचथल विधानसभेचे आमदार संताना चकमा यांनीही शपथ घेतली आहे. त्याचबरोबर सुशांत चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. चौधरी हे मजलीशपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय टिंकू रॉय यांनीही शपथ घेतली आहे.